पाटण – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने बुधवारी रात्रीपासून पुन्हा जोर धरल्याने धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. धरणात प्रतिसेकंद 58 हजार 13 क्युसेक्स पाणी येत असल्याने पाणीसाठा 67.27 टीएमसी झाला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास पुढील 72 तासांत धरणाचे दरवाजे उघडावे लागतील, अशी माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
कोयना पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाण्याची विक्रमी आवक होत असल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी येत्या 72 तासांत धरणातून विसर्ग करण्याशिवाय धरण व्यवस्थापनाला पर्याय राहणार नाही.
पाणलोट क्षेत्रात कोयना, नवजा, महाबळेश्वर, वळवण येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने तीन दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात तब्बल 15 टीएमसीने वाढ झाली. पाऊस सुरू व्हायच्या आधी धरणात 52 टीएमसी पाणीसाठा होता. आता धुवॉंधार पावसामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे व पायथा वीजगृहातून 72 तासांत पाणी सोडावे लागण्याचीशक्यता आहे.
तालुक्यातील कोयना, केरा, मोरणा, वांग, तारळी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मोरणा भागातील गुरेघर धरणातून बुधवारी पाणी सोडल्याने गोकुळ येथील फरशी पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे परिसरातील गावांचा मोरगिरीशी संपर्क काही काळ तुटला होता. ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधल्याने धरणातून सोडण्यात येणारे पाणी नियंत्रित करण्यात आले. त्यामुळे दळणवळण पूर्ववत झाले.
गेल्या तीन दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत होता; पण गुरुवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. धरणातील पाणीसाठा 73 टीएमसीपेक्षा जास्त झाल्यावर धरणातून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तूर्त विसर्ग करण्याचे नियोजन नाही.
संजय डोईफोडे , अधीक्षक अभियंता, कोयना सिंचन मंडळ.