आळंदी -करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आळंदीकरांचे आरोग्य राखण्यासाठी यंदाच्या वर्षी “एक गाव एक गणपती’चे आवाहन आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने ग्रामदेवत भैरवनाथ महाराज उत्सव मंडळ देवस्थानकडून करण्यात आले आहे.
भैरवनाथ महाराज उत्सव मंडळ देवस्थानचे अध्यक्ष शंकर कुऱ्हाडे यांनी आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकूश जाधव व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांना निवेदन दिले आहे. आळंदीत करोनाच्या रूग्णसंख्येत दररोज वाढ होत असून, सातजणांचा मृत्यूही झाला.
यामुळे सर्व गणेशक्त आणि प्रशासनाने मिळून बैठक आयोजित करून एक गाव एक गणपती बसवून उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. लोकहित आणि आरोग्य जपण्यासाठी साधेपणाने सर्वांनी मिळून गणेशोत्सव साजरा केल्यास करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.