पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला
तीन दिवसांत वाढले पाच टीएमसी पाणी
पुणे – मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत तब्बल पाच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. गुरुवारी सायंकाळी या चारही धरणांतील पाणीसाठा 15 टीएमसी ( 51%) झाला आहे. त्यामुळे शहरासमोरील पाणी कपातीचे संकट टळले आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असला, तरी या धरणसाखळीतील सर्वांत छोटे असलेले खडकवासला धरण 78% भरले आहे. त्यामुळे धरणातून पुढील काही दिवसांत विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे.
यंदा ऑगस्ट उजाडला, तरी शहराला पाणी पुरवठा खडकवासला धरण साखळीत पुरेसा पाऊस न झाल्याने खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांमध्ये अवघा 10 टीएमसी (33 टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यास पाणी कपात करण्याची चर्चा सुरू झालेली होती. मागील तीन दिवसांत या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळाधार पाऊस झाला आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी या धरणांचा पाणीसाठी 15.3 टीएमसी (51.56%) झाला आहे. हे पाणी शहराला पुढील दहा महिने पुरेल एवढे असून, शहरात 20 टक्के पाणी कपात केली तरी सध्याचा पाणीसाठा पुढील वर्षभर पुरेल इतका आहे.
दरम्यान, बुधवारी रात्रीही पावसाचा जोर कायम असल्याने खडकवासला धरण भरण्याची शक्यता लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने मुठा उजव्या कालव्यात 100 क्युसेक विसर्ग सुरू केला होता. हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला असून संध्याकाळी 5 वाजता सुमारे 429 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. तर रात्री पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन मुठा नदीत विसर्ग करण्यात येणार आहे.