साठवण तलावाचे काम सुरू न झाल्यास समृद्धीचे काम बंद पाडण्याचा काळेंचा इशारा
समृद्धी महामार्गाच्या कामात उपठेकेदार कोण आहे, हे भविष्यात नागरिकांना समजणार आहे. त्यामुळे पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्यास राजकीय दबाव कुणाचा आहे व कुणाला परवडत नाही, हे मी सांगायची गरज नाही. परंतु येत्या काही दिवसांत कोपरगावच्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर खेळणाऱ्यांचे पितळ उघडे केल्याशिवाय राहणार नाही.
आशुतोष काळे, युवा नेते
कोपरगाव – कोपरगाव शहरातील चार नंबर व पाच नंबर साठवण तलावाचे काम त्वरित सुरू करावे, यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांनी मागील पाच दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र अद्यापही काम सुरू न झाल्याने आज नागरिकांनी काळे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शहरात कडकडीत बंद पाळला. यावेळी दोन दिवसांत काम सुरू न झाल्यास समृद्धी मार्गाचे काम बंद पाडण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव क्रमांक पाचचे काम करण्यासाठी गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी सहमत होती. मात्र राजकीय दबाव आल्यामुळे या कंपनीने साठवण तलावाचे काम सुरू करण्याबाबत असमर्थता दाखविली असून, तसेच चार नंबर व पाच नंबर साठवण तलावाच्या कामाचे अंदाजपत्रक कोपरगाव नगरपरिषदेने तयार न केल्याच्या निषेधार्थ काळे यांनी शहर बंदचे आवाहन केले होते.
काळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगाव शहरातील व्यापारी, सर्व सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. कोपरगाव तालुक्याच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधी कोपरगाव शहराच्या पाणी टंचाईला जबाबदार असून, पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्यास नकार घंटा वाजवित आहे. येत्या दोन दिवसांत निर्णय न झाल्यास गायत्री कंपनी करीत असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम 3 जून पासून बंद पाडणार असल्याचा इशारा काळे यांनी दिला.
नागरिकांना आवश्यक असलेले पाणी आरक्षित असूनही केवळ साठवण तलाव क्षमता कमी असल्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पाणी टंचाईचा मोठा परिणाम कोपरगावच्या बाजारपेठेवर झाला असून, कोपरगावची बाजारपेठ ओस पडली आहे. महिला भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण कायम स्वरूपी थांबावी, यावर तोडगा काढण्यासाठी काळे यांनी या प्रश्नात हात घातला आहे. सुरू असलेले धरणे आंदोलन आपल्यासाठीच सुरू असल्याची जाणीव झालेल्या कोपरगावच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी, सामाजिक संघटना व कोपरगावचे नागरिक बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे बंद 100 टक्के यशस्वी झाला आहे. आशुतोष काळेंच्या धरणे आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. शहराचा पाणी प्रश्न सोडवून पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यावे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी आंदोलन स्थळी येवून व्यक्त केल्या. यावेळी आंदोलनास नागरिकांनी पाठिंबा दिल्याबद्दल आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या नागरिकांचे आभार मानले आहे.