पाणी पूर्ण आटले; जलाशय पात्रात केवळ 0.37 टक्के साठा
सात वर्षानंतर जुन्या यंत्रणेचे दर्शन
परिंचे – पुरंदर तालुक्यातील बहुतांशी गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून असलेल्या वरी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. 2012 मध्ये या धरणाने तळ गाठला होता, त्यानंतर सात वर्षांनी धरणाची जुनी धाटणी पुन्हा स्पष्टपणे दिसू लागली आहे. धरणाच्या ब्रिटिशकालीन खुणा दिसू लागल्या आहेत. या धरणात सध्या 0.37 टक्के पाणीसाठा शिल्लक असून धरण पूर्ण मोकळे पडले आहे, असे शाखा अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले.
पुरंदरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने या तालुक्यात अन्य ठिकाणांहून पाणी आणले तरी त्याचा साठा करण्याकरिता धरणाची गरज होती. याकरिता तालुक्याच्या मध्यातील गाव म्हणून वीर येथे 1928 मध्ये ब्रिटिशांनी हे धरण उभारले. जुन्या धरणांचा बांध, धरणाचे दरवाजे, जुने जॅकवेल, धरणातून डावा व उजव्या कालव्याद्वारे होणारी पण्याची वितरण व्यवस्था, धरणावर व कालव्यावर जाण्याकरिता उभारण्यात आलेला साकव पूल, शेतीला पाणी पुरवठा करण्याकरिता तयार करण्यात आलेली यंत्रणा यासारखे अवशेष अगदी स्पष्ट दिसत आहेत. 1962 मध्ये या धरणावर नवीन वीर धरण बांधण्याचे काम सुरू करण्यात येवून ते 1964 मध्ये पूर्ण करण्यात आले. तर, 1967 पासून धरणात पाणी साठविण्यास सुरूवात करण्यात आल्या नंतर याच वर्षी शेतीकरिता पहिले आवर्तन सोडण्यात आले होते.