कोल्हापूर – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे आज (मंगळवार) निकाल आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. आणि याच निवडणुकांचे आज निकाल जाहीर होणार आहेत.
अश्यातच, आज सकाळीच पहिला निकाल हाती आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत भाजपने खातं उघडल्याची बातमी आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेते हसन मुश्रीफ गटाला मोठा धक्का बसला आहे. बामणी ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून, घाडगेंच्या राजे गटाने बाजी मारली आहे. बामणी, निढोरी आणि रणदिवेवाडी या तीनही गावात भाजपचा झेंडा फडकला आहे. कागल तालुक्यात भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे.
दरम्यान, आतापर्यंत राज्यातील मतमोजणीमध्ये भाजपा आणि शिंदे गटाला 253 आणि मविआला 227 ग्राम पंचायतींमध्ये आघाडी मिळाली आहे. यापैकी भाजपा 150, शिंदे गटाला 103 ठाकरे गटाला 65, काँग्रेस 54, राष्ट्रवादी 108 आणि इतर 111 अशी आघाडी मिळालेली आहे. हे सुरुवातीचे कल आहेत.