राजेंद्र वाघमारे
नेवासा – तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्त्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा पाया मजबुत करण्याची संधी असतांना याकडे विरोधी भाजपच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. मात्र माजीमंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी या निवडणुकीत आपला वरचष्मा ठरला आहे. गावापातळीवर असलेल्या गडाख समर्थकांच्या दोन गटात ग्रामपंचायत निवडणूक झाली आहे. त्यामुळे कोणीही विजयी झाले तरी ते आमदार गडाख समर्थक विजयी होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तयाने आमदार गडाखांनी तालुक्यातील आपली पक्कड आणखी मजबुत केल्याचे चित्र आहे.
नेवासा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. त्यात चिंचबन ग्रामपंचायत निवडणूक सरपंचासह सदस्यांची जागा बिनविरोध झाली. तर तालुक्यातील सुरेशनगर, खुपटी, शिरेगांव, हिंगोणी अशा चार ग्रामपंचायतींचे सरपंचपद बिनविरोध झाले. त्यामुळे बारा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. 12 गावच्या सदस्यपदासाठी या निवडणुका झालेल्या असून या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीचा नेमका नफा आणि तोटा कोणाला होणार याबाबत गावपुढारी आपल्यालाच यश येणार असल्याचे सांगून या निवडणूकीत आपलाच गट बाजी मारणार असल्याचा गप्पा पारावर बसून चर्चिल्या जात असल्यामुळे या निवडणूकीचा कौल मतदान यंञात सध्या तरी बंद झालेला असला तरी आपणच बाजी मारणार असल्याच्या चर्चा परस्पर विरोधी गटाकडून चर्चिल्या जात आहेत.
गावगाड्याच्या निवडणुकीत सर्वाधित 80.16 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता या निवडणूकीत उमेदवारांचे भवितव्य मतदान यंञात बंद झाले. आता या निवडणूकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार मतदारांचा अंदाज घेवून आपणच बाजी मारणार असल्याच्या वावड्या उठवून मतदारांचे आभारही मानु लागले आहेत. आ. गडाख समर्थकांचे गावपातळीवर दोन गट निर्माण झाल्यामुळे कोणीही विजयी झाले तरी तो आपला असणार हे समीकरण झाले आहे.
आ. गडाखांची ताकद वाढणार
आमदार गडाखांचा तालुक्यात राजकीय मजबूत किल्ला झालेला असून गावपातळीवरील एकमेकांचे दोन गट विरोध करीत असले तरी आमदार गडाखांचे निष्ठावान दोन्ही गटातील कार्यकर्ते आहे. त्यामुळे आमदार गडाखांची ताकद आणखी मजबुत होणार आहे.