सिडनी – कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आयसीसीने तयार केलेल्या नव्या गुणपद्धतीवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. सलग विजयांसह सर्वात जास्त गुण मिळवल्यानंतरही गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर कसा, असा प्रश्न कोहलीने आयसीसीला विचारला आहे.
सर्वाधिक गुण असूनही आम्ही दुसऱ्या स्थानावर का. आयीसीसीचा हा नवा नियम गोंधळात टाकणारा आहे. अचानक नियमांत असे बदल का केले गेले, अशी विचारणाही कोहलीने केली आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू करण्यात आली होती, त्यावेळी सर्वाधिक गुण ज्या संघाचे असतील तो अव्वल असेल, असे सांगण्यात आले होते. पण आता स्पर्धा अर्ध्यावर असताना आयसीसीने बदललेला नियम समजलेला नाही. असा अनाकलनिय नियम का केला गेला, असा सवालही कोहलीने केला आहे.
भारताने आतापर्यंत तीन कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यात भारताने 9 सामन्यांत 7 विजय मिळवले आहेत. दोन सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाचे 360 गुण आहेत. तरीही गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर आहे. त्यांनी चार कसोटी मालिका खेळताना 10 सामन्यांत 7 विजय मिळवले आहेत. त्यांनाही दोन सामने गमवावे लागले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यांचे एकूण गुण 296 आहेत. मात्र, तरीही ते पहिल्या स्थानावर आहेत.