सिडनी – भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. करोना काळात ठप्प झालेल्या स्पर्धांमुळे जवळपास 650 कोटी रुपयांचा तोटा झालेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला भारतीय संघामुळे तब्बल 1650 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.
भारतीय संघाच्या या दौऱ्यातून ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ मालामाल होणार असून टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या रद्द होण्यामुळे झालेले नुकसानही भरून निघणार आहे. करोनामुळे सर्व स्पर्धा स्थिगित झाल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला प्रचंड नुकसान झाले होते. त्यांनी मंडळातील अनेकांना डच्चूही दिला होता. करोनामुळेच टी-20 विश्वकरंडकही रद्द झाला होता. मात्र, तरीही बीसीसीआयने आपला संघ हा दौरा करेल असे जाहिर केले होते. त्यानूसार या दोन संघातील मालिकेला प्रारंभ झाला व त्याचवेळी त्यांच्या मंडळाला प्रचंड फायदा होणार हे देखील स्पष्ट झाले होते.
भारताच्या दौऱ्यातून ऑस्ट्रेलिया मंडळाला 1650 कोटी रुपये मिळणार आहेत. भारतीय संघाची मार्केट व्हॅल्यू मोठी असल्याने अन्य देशांविरुद्धच्या मालिकांमध्ये जाहिरातीही जास्त मिळतात व त्यामुळे नफाही प्रचंड होतो. हेच लक्षात घेत ऑस्ट्रेलिया मंडळाने बीसीसीआयकडे हा दौरा रद्द होऊ नये यासाठी फिल्डिंग लावली होती.
शुक्रवारपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. त्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका तर, चार कसोटी सामन्यांची मालिकाही होणार असून त्यामुळेच गेल्या आठ महिन्यांत झालेला तोटा केवळ दोन महिन्यंतच भरून निघणार आहे.