मुंबई -चेन्नईचा खेळाडू एस. बर्दीनाथ याच्या जागी भारतीय संघात विराट कोहलीची निवड केली व माझे निवड समितीचे अध्यक्षपद गेले, असा धक्कादायक खुलासा दीलीप वेंगसरकर यांनी केला आहे. 2008 साली भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वकरंडक जिंकला होता, त्यात कोहलीची फलंदाजी मी पाहिली होती व म्हणूनच मी त्याच्या नावावर अडून बसलो होतो.
त्यावेळी एन. श्रीनिवासन व तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी कोहलीचा खेळ पाहिला नसल्याने ते त्याच्या नावावर नापसंती दर्शवत होते. मात्र, तरीही मी अन्य सदस्यांच्या पाठींब्याच्या जोरावर कोहलीची निवड केली. मात्र, त्याचा मला खूप मोठा फचका बसला व निवड समितीचे अध्यक्षपद सोडावे लागले, असेही वेंगसरकर यांनी म्हटले आहे.
धोनीला कोहली संघात नको होता. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार होता. धोनी आणि बीसीसीआयचे तत्कालीन खजिनदार एन. श्रीनिवासन यांना तामिळनाडूचा फलंदाज एस. बद्रीनाथ संघात हवा होता. बद्रीनाथ चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू असल्याने त्यांना त्यालाच संघात घ्यायचे होते. कोहलीचा समावेश झाल्यावर बद्रीनाथला वगळावे लागले.
त्यामुळे एन. श्रीनिवासन नाराज झाले होते. धोनीसह गॅरी कर्स्टनला देखील कोहली नको होता. मात्र, कोहलीला संघात समाविष्ट करण्याची हीच योग्य वेळ आहे हे मी सांगितले. अन्य चार सदस्यांनी माझ्या निर्णयाचे समर्थन केले मात्र, कर्स्टन आणि धोनी यांनी विरोध केला कारण त्यांनी कोहलीला पाहिले नव्हते, असेही ते म्हणाले.
मात्र, जेव्हा कोहलीची गुणवत्ता पाहिली त्यानंतर धोनीने कोहलीला विरोध केला नाहीस तसेच बीसीसीआयच्या निवड समितीच्या निर्णयावरही कोणी प्रश्न उपस्थित केले नाहीत. मात्र, त्यावेळी मला निवड समितीचे अध्यक्षपद सोडावे लागले त्याची खंत वाटते, असेही ते म्हणाले.
… आणि श्रीकांत अध्यक्ष बनले
कोहलीची निवड केल्यानंतर श्रीनिवासन यांनी मला कारण विचारले. कोहलीला मी खेळताना पाहिले आहे तो इतर खेळाडूंपेक्षा वेगळा आहे, असे मी उत्तर दिले.
दुसऱ्याच दिवशी एन. श्रीनिवासन कृष्णमाचारी श्रीकांत यांना शरद पवारांकडे घेऊन गेले. पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते आणि माझ्या जागी श्रीकांतला मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले, असेही वेंगसरकर म्हणाले.