नवी दिल्ली – भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जात असून त्यासाठी कसोटी व एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघात आयपील स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी केलेल्या यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, नवदीप सैनी व ऋतूराज गायकवाड यांना स्थान देण्यात आले आहे.
मधल्या फळीतील तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले असून वेगवान गोलंदाज महंमद शमीला या संपूर्ण दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच या मालिकेत नेतृत्व करणार असून त्याला विश्रांती देण्यात आलेली नाही.
इंग्लंडमधील काउंटी स्पर्धेत सातत्याने धावा केलेल्या पुजाराला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सपशेल अपयश आले होते, त्यामुळे त्याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघातून वगळले गेले आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने धावा केलेल्या जयस्वालला कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी दिली गेली आहे. त्याच्यासह ऋतूराज गायवकवाडलाही कसोटी संघात स्थान देण्यात आले असून गोलंदाज मुकेश कुमार व नवदीप सैनी यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
अनुभवी वेगवान गोलंदाज शमीसह उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्याकडेच कर्णधारपद असून उपकर्णधारपदी पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेची नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या 12 जुलैपासून या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी, तीन एकदिवसीय तसेच पाच टी-20 सामने खेळणार आहे.
भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतूराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), श्रीकर भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, महंमद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतूराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, महंमद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.