श्रीनगर – काश्मिरी पंडितांची निर्घृण हत्या करणाऱ्या बिट्टा कराटेवर तब्बल 31 वर्षांनंतर खटला चालणार आहे. बिट्टा कराटे याचं खरं नाव फारुख अहमद दार आहे. 1990 मध्ये 30 ते 40 काश्मिरी पंडितांची हत्या केल्याचे स्वतः बिट्टाने कबूल केलं होतं.
आता बिट्टावर खुनाचा खटला चालणार आहे. व्यापारी सतीश टिकू यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांनी श्रीनगर न्यायालयात पुन्हा सुनावणीसाठी अर्ज केला आहे.
न्यायालयाने सतीश टिकूच्या कुटुंबीयांना सुनावणीदरम्यान याचिकेची हार्ड कॉपी सादर करण्यास सांगितले आहे. आता या प्रकरणावर 16 एप्रिलला पुन्हा सुनावणी होणार आहे. टिकूच्या कुटुंबीयांच्या वतीने वकील उत्सव बैंस न्यायालयात आपली बाजू मांडत आहेत.
बिट्टा कराटेने टेलिव्हिजनवर खुनाची कबुली आधीच दिली आहे. फारुख अहमद दार याला मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतल्यामुळे बिट्टा कराटे हे नाव मिळाले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
काश्मिरी पंडितांना न्याय देण्याची मागणीही देशभरातून जोर धरू लागली आहे. काश्मिरी पंडितांवर अत्याचार करणाऱ्या दहशतवाद्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही लोक करत आहेत.
बिट्टा सध्या जामिनावर बाहेर आहे. निरपराध काश्मिरी लोकांची हत्या केल्याप्रकरणी त्याला तुरुंगवास भोगावा लागला. 1991 मध्ये त्याने एका मुलाखतीत 20 काश्मिरी पंडितांची हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याला सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्याच्यावर बंडखोरीशी संबंधित १९ हून अधिक खटले आहेत. तो 16 वर्षे तुरुंगात होता आणि त्यानंतर टाडा न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.