मुंबई – मंत्री दीपक केसरकर यांनी अंतरवाली सराटीमधील पोलीस अधिकारी तुषार दोशींच्या बदलीला स्थिगिती देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात केसरकरांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र देखील लिहिले आहे. चौकशी सुरु असलेल्या अधिकाऱ्यांची अशा प्रकारे पोस्टिंग करणे चुकीचे असल्याचे केसरकरांनी म्हटले आहे.
जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर जालना पोलिसांनी अमानुष लाठीमार केला असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत होते.
त्यानंतर, या सर्व प्रकरणाची गृह विभागाने गंभीर दखल घेत जालना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर पहिली कारवाई केली. पोलीस अधीक्षक दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश गृह विभागाने काढले होते.
मात्र, आता दोशी यांची जालना येथून बदली करण्यात आली आहे. तुषार दोशी यांची बदली पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
नक्कीच मी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिले होते, कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे. त्यातच चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याला अशा प्रकारची पोस्टिंग देणे चुकीचे वाटले, त्यांची पोस्टिंग थांबवून काही काळ हेडक्वार्टरमध्ये काम करता येईल.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढचे बघता येईल, म्हणून मी ही पोस्टिंग थांबावी यासाठी पत्र लिहिले होते. हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी मला मुख्यमंत्री भेटले आणि त्या दिवशी त्यांना विषय समजावून सांगून मी पत्र देखील दिले.
जर तेव्हा देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असते तर त्यांना देखील मी हे पत्र दिले असते आणि हा विषय समजावून सांगितला असता, असेही केसरकरांनी यावेळी म्हटले आहे.