तिरुवअनंतपूरम: मानवी जीवनावरच आघात करणाऱ्या करोना विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून भारतातही पाहायला मिळत आहे. करोनाशी सुरु असणाऱ्या लढ्यामध्ये प्रतितबंधात्मक उपाय, सतर्कता आणि निर्देशांचं पालन करत आता केरळ या राज्याने या व्हायरसचा प्रादुर्भाव काही अंशी नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं आहे.
एका संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर बातमीनुसार रविवारी केरळमध्ये करोनाचे फक्त 2 नवे रुग्ण आढळले. तर, 36 रुग्णांना करोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून रजा देण्यात आली. भारतात करोनाचा पहिला रुग्ण हा केरळमध्येच असल्याचं उघड झालं होतं. ज्यानंतर मुख्यमंत्री पीनरई विजयन यांच्या सरकारकडून या विषाणूशी लढण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली गेली. परिणामी केरळमध्ये तब्बल 179 करोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, आता करोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या अवघी 194 इतकी असल्याचं कळत आहे. अनेक ठिकाणी करोनाचे हॉटस्पॉट असतानाही केरळमध्ये रुग्णांची संख्या ही एकअंकी वाढताना दिसली. सध्याच्या घडीला भारतात एकंदर चित्र पाहता दर 100 रुग्णांमागे 9 रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. पण, केरळचा विचार केल्याच येथील रुग्णसंख्येच्या तुलनेत तब्बल 48 टक्के रुग्ण आतापर्यंत घरी परतले आहेत.
केरळमधीलच एका अधिकाऱ्यांचा हवाला देत प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली. पण, यातही करोना प्रभावित देशातून परतल्याचा इतिहास असलेलेच रुग्ण आढळले होते. सध्या केरळमध्ये करोनाचे जे रुग्ण आढळत आहेत ते या परदेशातून परतलेल्यांचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी आहेत. त्यामुळे राज्यात करोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झालेली नाही हे आता उघड झालं आहे. त्यामुळे सध्या केरळ प्रशासनाकडून परदेशातून परतलेल्यांचीच कोरोना चाचणी करण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे.
केरळच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार करोनाबाधित रुग्ण हे तीन आठवड्यांच्या कालावधीत बरे होत आहेत. वुहानमधून परतलेल्यांना मात्र यातून सावरण्यासाठी महिनाभराचा काळ लागला होता हे सुद्धा खरं. स्वयंशिस्त, प्रशासनाला नागरिकांचं मिळालेलं सहकार्य या बळावर आज केरळ देशभरात कोरोनाशी आपली झुंज एका यशस्वी मार्गाने नेताना दिसत आहे. महाराष्ट्रातही जनतेने पूर्ण सहकार्य केल्यास कोरोनावर मात करणं सहज शक्य होणार आहे.