नवी दिल्ली – जागतिक क्रिकेटमधील 1970 च्या दशकातील सर्वात बलाढ्य संघ म्हणून नावाजलेल्या वेस्ट इंडिजवर कसोटीत विजय मिळवित ऐतिहासिक कामगिरी केलेल्या भारतीय संघाच्या विक्रमाला आज पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या या अभूतपूर्व यशाबद्दल तत्कालीन संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
भारतीय क्रिकेटच्या आजवरच्या वाटचालीत 12 एप्रिल 1976 या दिवसाला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखालील संघाने वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजीच्या जगप्रसिद्ध तोफखान्यातील हवाच काढून टाकली होती.
क्लाईव्ह लॉइड यांच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाचा पोर्ट ऑफ स्पेनच्या त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना आजच्याच दिवशी भारताने जिंकला व एकप्रकारे त्यांच्या वर्चस्वाला आव्हानही दिले. या सामन्यात 5 व्या म्हणजेच अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 269 धावांची गरज होती.
वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 359 धावा केल्या. त्यात व्हिव्हियन रिचर्डसने 177 धावांची अजरामर खेळी केली. भारताकडून भागवत चंद्रशेखर यांनी 6 तर, कर्णधार बेदी यांनी 4 गडी बाद केले. त्यानंतर भारताच्या पहिल्या डावात 228 धावा झाल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजने आपला दुसरा डाव 6 बाद 271 धावांवर घोषित केला आणि भारतासमोर विजयासाठी 403 धावांचे अशक्य आव्हान उभे केले. सुनील गावस्कर यांनी 102 धावांची तर, गुंडप्पा विश्वनाथ यांनी 112 धावांची खेळी करत संघाचा विजय निश्चित केला.
गावसकर बाद झाल्यानंतर मोहिंदर अमरनाथ यांनी विश्वनाथ यांना सुरेख साथ देत आक्रमक फलंदाजी केली. विश्वनाथ परतल्यावर ब्रिजेश पटेल यांनी अमरनाथ यांच्या साथित संघाचा विजय साकार केला. अमरनाथ 85 धावांवर नाबाद राहिले तर पटेल 49 धावांवर नाबाद राहिले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या डावात 400 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत भारतीय संघाने इतिहास घडविला. हा विक्रम जवळपास 27 वर्ष भारतीय संघाच्या नावावर होता.