नवी दिल्ली – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी आज दिल्लीत जंतरमंतर येथे संसदेत महिला आरक्षण विधेयक संमत केले जावे, या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाचा प्रारंभ मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांच्या हस्ते झाला.
यावेळी उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्या सीमा शुक्ला, तेलंगणाच्या शिक्षण मंत्री सविता इंद्रा रेड्डी तसेच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री सत्यवती राठोड यांचा समावेश होता. संजय सिंह आणि चित्रा सरवरा (आप), नरेश गुजराल (अकाली दल), अंजुम जावेद मिर्झा (पीडीपी), शमी फिरदौस (एनसी), सुश्मिता देव (टीएमसी), केसी त्यागी (जेडीयू), सीमा मलिक (राष्ट्रवादी), श्याम रजक (आरएलडी), प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना) आणि माजी कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
महिला आरक्षण विधेयक मंजूर होईपर्यंत आमचा पक्ष कविता यांना या आंदोलनात पाठिंबा देईल, राजकारणात महिलांना समान संधी देण्यासाठी हे विधेयक आणणे महत्त्वाचे आहे, असे येचुरी यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले.
कविता म्हणाल्या, भारताचा विकास करायचा असेल तर राजकारणात महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. त्यासाठी गेल्या 27 वर्षांपासून प्रलंबित असलेले हे विधेयक संसदेत संमत होणे महत्त्वाचे आहे. ही फक्त सुरुवात असून देशभरात आंदोलन सुरूच राहील, असेही त्या म्हणाल्या.
“भारताविषयी खोटी माहिती…” भाजप नेत्यांचा आता न्यूयॉर्क टाइम्सवर हल्लाबोल
लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याचे विधेयक संयुक्त आघाडी सरकारने 12 सप्टेंबर 1996 रोजी लोकसभेत मांडले होते. पण अजून ते अद्याप मंजुर झालेले नाही. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए-1 सरकारने मे 2008 मध्ये हे विधेयक पुन्हा सादर केले. त्यावेळी ते राज्यसभेत मंजूर झाले, परंतु ते स्थायी समितीकडे पाठवले गेले. मात्र, हे विधेयक पंधराव्या लोकसभेत रद्द झाले. तेव्हापासून हे विधेयक थंड्या बस्त्यात पडून आहे.