गुवाहाटी – आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य आणि वाघांसाठीचे राखीव क्षेत्र देशातील तसेच परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी बुधवारपासून खुले करण्यात आले आहे. मात्र करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर दहा वर्षाखालील मुले आणि 65 वर्षावरील नागरिकांना अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नाही.
मानस राष्ट्रीय अभयारण्य 2 ऑक्टोबर रोजी खुले करण्यात आल्यानंतर काझीरंगा हे देशातील दुसरे अभयारण्या पर्यटकांसाठी खुले झाले आहे. आसाममध्ये पाच अभयारण्ये असून ओरांग राष्ट्रीय अभयारण्य आणि वाघांसाठीचे राखीव क्षेत्र 1 नोव्हेंबरपासून खुले होणार आहे.
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी औपचारिकरित्या हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले केले. काझीरंगा अभयारण्या गेंड्यांसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. आसाममधील अभयारण्ये सुरु होऊ लागल्याने राज्याची अर्थव्यवस्था पूर्ववत होण्यास हातभार लागेल असे मानले जाते. करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आसाममधील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसलेला आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अभयारण्ये बंद असल्याने पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरवर्षी काझीरंगा अभयारण्यासाठीचे प्रवेश शुल्क, सफारी शुल्क आणि वनविभागाच्या अतिथीगृहात राहण्याचे भाडे मिळून शासनाला सहा कोटी रुपयांचा महसूल मिळतो असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेली निदर्शने आणि आंदोलने आणि नंतरच्या लॉकडाऊनमुळे अभयारण्याच्या व्यवस्थापनालाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहेत.
पावसाळ्याच्या काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत दरवर्षी काझीरंगा अभयारण्य बंद ठेवण्यात येते. यावर्षी तर 1988 नंतर अभयारण्याला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. आता आसाममधील दुर्गापूजा उत्सव नंतर सणांमुळे येणाऱ्या सुट्ट्यांच्या दिवसांत पर्यटकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.
अभयारण्य खुले करण्यात आले असले तरी पर्यटकांना काटेकोर नियम पाळावे लागणार आहेत. कारण आसाममध्ये 31 मार्च पासून सुमारे दोन लाख जणांना करोनाची लागण आणि त्यातील 850 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पर्यटकांना नियमानुसार सगळी खबरदारी घ्यावी लागणार आहे.
त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या जीप सफारीतही नेहमीच्या क्षमतेपेक्षा निम्मेच पर्यटक असतील. 2018-19 मध्ये आसामला देशातील 4 लाख 71 हजार 971 पर्यटकांनी तर विदेशातून आलेल्या 25 हजार 739 पर्यटकांनी भेट दिली होती.