पुणे – “दान करा रक्ताचे, वाचेल आयुष्य एखाद्याचे’, या दैनिक “प्रभात’ने केलेल्या आवाहनाला तरुण-तरुणींसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी (दि. 6) दैनिक “प्रभात’ कार्यालयात आयोजित शिबिरात सुमारे 131 दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यात विशेषत: तरुणांचा मोठा सहभाग होता. या उपक्रमास शहरातील मान्यवरांसह पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी भेट देत दैनिक “प्रभात’ने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
दैनिक “प्रभात’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद गांधी यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्यांची संख्या अधिक होती, हे या शिबिराचे वैशिष्ट्य ठरले. पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्यांच्या मनात थोडीशी भीती; तर काहीशी शंका होती. मात्र, रक्तदानानंतर या तरुणांमध्ये वाढलेला आत्मविश्वास आणि त्यांनी दरवर्षी रक्तदान करण्याचा केलेला संकल्प, इथेच “प्रभात’चा सामाजिक उद्देश साध्य झाला.
उन्हाळ्यामध्ये शहरासह राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागतो. तर, रक्तदानाबाबत आजही गैरसमज असल्यामुळे काही युवक रक्तदानासाठी पुढे येत नाहीत. अशा वेळी नागरिकांची भीती दूर व्हावी, रक्तदानापेक्षा श्रेष्ठ असे मोठे दुसरे दान नाही, याबाबत दैनिक “प्रभात’कडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. सर्व स्तरांतून नागरिकांशी संवाद साधून रक्तदान का करावे, यासाठी आवाहन केले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.
यावेळी ब्लड ट्रान्सफ्युजन अधिकारी डॉ. रमेश सांगवीकर, जनसंपर्क अधिकारी रुपाली बांदल यांच्यासह परिचारिका अक्षया लांबे, रुपवती, मीनाक्षी चव्हाण, अमृता केरीपाळे, सोनाली राजपूत, मृण्मयी इंगळे, नितीन मकरंद, गोविंद खापरे, माधुरी चौधरी, सर्जेराव भोसले यांच्यासह दैनिक”प्रभात’चे कर्मचारी यांनी शिबिर यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय रक्तपेढीचे सहकार्य
दैनिक “प्रभात’च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. रुग्णालयाच्या वतीने दैनिक “प्रभात’ला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी दैनिक “प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, व्यवस्थापक रविकुमार इंडी, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, व्यवस्थापक प्रवीण थूल, मुख्य लेखाधिकारी अशोक जोशी, डॉ. रमेश सांगवीकर, रुपाली बांदल यांच्यासह दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ब्लड बॅंकेची टीम उपस्थित होती.
सर्वाधिक रक्तदाते 18 ते 35 वयोगटातील
या रक्तदान शिबिरामध्ये वय वर्षे 18 ते 25 या गटातील मुलांची संख्या जवळपास 50 हून अधिक होते. तर, 18 ते 35 वयोगटातील रक्तदात्यांची संख्याही 75 टक्के होती. त्यामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा करणाऱ्या रक्तादात्यांचा उत्साह अधिक होता. त्यामुळे त्यांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर झाले. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे काहींना रक्तदान करता आले नाही. मात्र, “मी स्ट्राॅंग आहे, मला काही होत नाही, रक्तदान करण्याची माझी इच्छा आहे,’ असा आग्रह धरणारे तरुणही शिबिरात होते.
शतक पूर्ण करताच टाळ्या वाजवून रक्तदात्यांचे अभिनंदन
सकाळी 9 वाजल्यापासून रक्तदानासाठी दात्यांची गर्दी सुरू झाली. यावेळी दुपारी उन्हाचा चटका पाहता, गर्दी कमी होण्याची शक्यता असताना, दाते रखरखत्या उन्हातही रक्तदानासाठी शिबिरामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळेच दुपारीच शंभरावे रक्तदात्याची नोंद होताच डॉक्टर, कर्मचारी यांसह “प्रभात’कडून टाळ्या वाजवून दात्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र आणि रोप देऊन वृक्षलागवडीचा संदेशही यावेळी “प्रभात’ने दिला. दात्यांचा प्रतिसाद पाहून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिबिर सुरू ठेवण्यात आले.
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास “प्रभात’चा खारीचा वाटा
रक्त हा कोणताही भेद न मानणारा घटक आहे. आपत्कालीन स्थितीत अनेकदा रुग्ण, अपघातग्रस्त व्यक्तीला रक्ताची गरज भासते. त्यात उन्हाळा सुरू झाल्यामुळे शहरातील सर्वच ब्लड बॅंकांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो. रक्तासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागते. या पार्श्वभूमीवर दैनिक “प्रभात’ने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आणि रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास हातभार लावण्यासाठी शिबिराचे आयोजन करत आज 131 रक्तपिशव्या संकलन करून तुटवडा भरून काढण्यास खारीचा वाटा उचलला आहे.
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचाही उत्स्फूर्त सहभाग
“रक्तदान…श्रेष्ठदान’, “प्रत्येकाने करावे रक्तदान, गरजूला मिळेल जीवनदान’ अशा घोषणा देत पुणे वृत्तपत्र विक्रेता संघानेही या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पारगे यांनी रक्तदान करून सर्वांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. यावेळी अध्यक्ष पारगे यांच्यासह उपाध्यक्ष दत्ताभाऊ पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरूण निवंगुणे, विश्वस्त संदीप शिंदे, राजेंद्र रसाळ, यशवंत वाढवणे आणि सुनील बोरकर, आनंद वायकर, कैलास नाकते, राहुल चिंचकर, महादेव नेमाणे, शामभाऊ धायगावे, यशवंत बोगम, चंदन कोराळकर उपस्थित होते.
तज्ज्ञ म्हणतात…
आपल्या शरीरात साडेचार ते पाच लिटर रक्त असते. त्यातील केवळ 3५० ते ४५० एम.एल. रक्त घेतले जाते. रक्तदान केल्यानंतर शरीरात रक्तवाढीची प्रक्रिया तत्काळ सुरू होते. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन ते चार व्यक्तींना जीवनदान मिळते. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करावे. गैरसमजुतीमुळे अनेक दाते रक्तदानासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते. एकदा रक्तदान केल्यावर पुरूष तीन महिन्यानंतर तर महिला चार महिन्यानंतर पुन्हा रक्तदान करू शकतात. या कालावधीमध्ये शरीरातील रक्त पेशी पूर्णपणे तयार होतात. रक्तदान केल्यामुळे रक्तपेशी अॅक्टिव्ह राहतात, रक्तप्रवाह चांगला सुरू राहतो. तसेच हिमोग्लोबिनमध्येही वाढ होते. चांगल्या आरोग्यासाठी रक्तदान गरजेचे आहे. – डॉ. संजीव केतकर, रक्तसंकलन केंद्रप्रमुख, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय.
मित्रमंडळींना प्रोत्साहन द्यावे
शहरात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा भासतो. त्यामुळे १८ वयोगटापुढील तरूणांसह नागरिकांनी रक्तदानाला प्राधान्य देत आपल्या मित्रमंडळींनाही प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन डॉ. संजीव केतकर यांनी केले आहे.