कोल्हार, (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द- चिंचोलीच्या संयुक्त जलजीवन मिशन योजनेचे काम रखडल्यामुळे कोल्हार खुर्द येथे भीषण पाणी टंचाईचे वृत्त दैनिक प्रभातमधून प्रसारित करण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत १० दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्याला विराम देत अवघ्या ५ व्या दिवशी ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी दैनिक प्रभातचे आभार मानले.
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे गेल्या वर्षभरापासून मंजूर झालेल्या जलजीवन मिशन योजनेचे काम रखडले आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या पसरवण्याचे काम अपूर्ण असताना स्थानिक प्रशासनाने आताताईपणा करत साठवण तलावाच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, सदर काम करत असताना येणाऱ्या पाणी टंचाईचा विचार न करताच कामाला गती दिल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली.
गावात पिण्यासाठी तब्ब्ल १० दिवसाड पाणी पुरवठा स्थनिक प्रशासनाकडून करण्यात येत होता. याबाबत दैनिक प्रभातमध्ये दि. 2८ रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. यानंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आणि १० दिवसाड करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करून गावठाण हद्दीत ५ व्या दिवशी पाणी उपलब्ध करून दिले. मिळालेल्या हक्काच्या पाण्याने ग्रामस्थ संतुष्ट झाले. अनेक ग्रामस्थांनी दैनिक प्रभातचे आभार मानले असून, पाणी टंचाईच्या विषयावर निर्भीडपणे लिखाण केल्याने ग्रामस्थांची पाणी टंचाईतून काही प्रमाणात मुक्तता झाली.