संतांची मांदियाळी आणि विठुरायाचे दर्शन ही वारकऱ्यांची अस्मिता. देहु-आळंदी हे त्यांचे माहेर. याच पवित्र भूमीत पुणे शहरातील काही ऐतिहासिक विठ्ठल मंदिरांची माहिती आषाढी एकादशीपर्यंत “विठुमाउली’ या सदराखाली खास “प्रभात’च्या वाचकांसाठी…
अत्यंत सुबक, लाकडी बांधकाम असलेले आणि मंदिराची पारंपरिकता लक्षात येणारे हे पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठल मंदिर आहे. हे मंदिर कौलारू, उतरत्या छपराचे साधारण पेशवेकालीन आहे. मात्र, आता त्याचा जीर्णोद्धार झाला आहे. मंदिराचे सभामंडप 100 वर्षांपूर्वीचे असून या मंडपाच्या छताची सुबकता वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. काळ्या पाषाणातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती याही जुन्याच आहेत आणि त्यांच्या प्राणप्रतिष्ठेवेळी हभप किसनराव साखरेमहाराज उपस्थित होते. अलीकडेच मूर्तींना वज्रलेपन केले आहे.
मंदिर परिसरात दक्षिणमुखी मारुती असून, शंकराची पिंडही आहे. “मंदिरात कुठेही तेल-पाणी वाहू नये,’ असे बोर्ड लावून मंदिराची स्वच्छता आणि पावित्र्य जपलेले लगेच दिसून येते. विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींबरोबरच गणपतीची मूर्तीही पेशवेकालीन आहे. या मंदिरात पूर्वी भजन, कीर्तन, प्रवचने मोठ्या प्रमाणावर होत असत. मंदिर परिसरात आठ खोल्या आणि भटारखाना आहे. धर्मप्रथेनुसार चैत्र पाडव्याला मंदिरात ध्वजारोहण होते. याबरोबर पाडवा ते रामनवमी असा सप्ताह मंदिरात असतो. याबरोबरच महिलांचा हरिपाठाचा कार्यक्रम रोज सायंकाळी होतो. यात माउलींचा हरिपाठ, नाथांचा हरिपाठ यांचा समावेश आहे. वर्षातून दोन वेळा मुक्त भंडारा येथे होतो.
माऊली कऱ्हाडकरांची दिंडी वारी काळात या ठिकाणी उतरते, या दिंडीची व्यवस्था येथे केली जाते. मंदिर भर बाजारपेठेत असल्याने यासाठी आणि उत्सवासाठी येथील व्यापाऱ्यांचीही मदत होते. या मंदिराची कार्यकारिणी दर पाच वर्षांनी बदलते. सध्या सूर्यकांत दगडे (अध्यक्ष), शिवाजीराव कराळे (सेक्रेटरी), महेश टकले (खजिनदार) आणि नरेंद्र ऊर्फ किरण मेनकर, विजय मेनकर, तुळशीदास चव्हाण आणि तात्या शिंदे हे विश्वस्त आहेत.
रामनवमीचा सोहळा
मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी केली जाते. यावेळी दिंडी मिरवणूक निघते, तिला छबिना म्हणतात.
गाडगे महाराजांनी दिली होती भेट
या मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, गाडगेमहाराज यांनी भेटी दिल्याचे मंदिराचे विश्वस्त सूर्यकांत दगडे यांनी सांगितले.
तुकोबांच्या पत्नीचे माहेर समोरच
तुकाराम महाराजांच्या जीजा (आवली) पत्नी गुळवे या घराण्यातल्या होत्या. त्यांचे माहेर या मंदिराच्या समोरच आहे.
पानशेतच्या पुरानंतर विहीर ठरली जीवदायिनी
येथे एक मोठी विहीर आहे. या विहिरीचे पाणी 1962 च्या पानशेत पुरानंतर महिनाभर परिसरातील नागरिक वापरत होते, खऱ्या अर्थाने ही विहीर जीवनदायिनी ठरली.
बालगंधर्वांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन
पूर्वी मंदिराची व्यवस्था ह. भ. प. गोविंदबाबा तनपुरे पाहत होते. ते 102 वर्षे जगले. त्यांच्याच नावाने मंदिराच्या आवारात सभागृह बांधले असून, या हॉलचे उद्घाटन बालगंधर्व यांच्या हस्ते साधारण 1960 च्या दरम्यान करण्यात आले.