जम्मू – काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या हिंदुंच्या हत्येच्या निषेधार्थ आणि तेथील सर्व हिंदु सरकारी कर्मचाऱ्यांची जम्मू विभागात बदली करण्यात यावी, या मागणीसाठी काश्मिरी पंडितांची जम्मू येथे निदर्शने सुरूच आहेत.
या हत्या प्रकारांची चौकशी केली जावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. रजनी बाला या हिंदु शिक्षिकेची अलीकडेच दहशतवाद्यांनी हत्या केली. त्या आधी राहुल भट आणि एका बॅंक व्यवस्थापकाचीही दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. त्यामुळे काश्मिरातील हिंदु समुदायात मोठीच दहशत निर्माण झाली आहे.
जीवाच्या भीतीने अनेकांनी काश्मीर खोरे सोडून जम्मूत आश्रय घेतला आहे. आज या शहरातील मध्यभागात झालेल्या निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. त्यांच्याकडून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या.