अमरावती (कौडण्यपूर) – टाळ, मृदुंगाचा गजर व विठ्ठलनामाचा जयघोष करीत श्री रुख्मणी मातेच्या पालखी सोहळ्याने सासरच्या ओढीने श्री क्षेत्र पंढरपूरकडे शुक्रवारी (दि. 3जून) प्रस्थान ठेवले. दोन वर्षांच्या करोना प्रतीबंधानंतर रुक्मिणी मातेच्या माहेरच्या पालखीचे अत्यंत ऊत्साहात व भक्तीपुर्ण वातावरणात प्रस्थान झाले. वारकऱ्यांमध्ये विशेष ऊत्साह पहावयास मिळाला.
रूक्मिणी मातेची विदर्भातील एकमेव मानाची पालखी आहे. पालखी सोहळ्याचे हे 428 वे वर्ष आहे. सकाळी संस्थानचे अध्यक्ष नामदेवजी अमालकर, पालखी सोहळा प्रमुख तथा सचिव सदानंद साधु यांनी सपत्नीक पादुकांची विधीवत पूजा, अभिषेक व आरती केली. यावेळी पालखी प्रमुख विश्वस्त सुरेश काका चव्हाण, सह प्रमुख हभप सर्जेराव महाराज देशमुख, हभप पंकज महाराज महल्ले, सुनील वेरूलकर, विश्वस्त अतुल ठाकरे, विणेकरी विठोबाजी बागडे यांच्यासह आदी रूक्मिणी मातेचे भक्त उपस्थित होते.
हा सोहळा अमरावती, कारंजा, वाशीम, परभणी, उस्मानाबाद, गंगाखेड, बार्शी मार्गे 33 दिवसांंचा प्रवास करून दि. 6 जुलै रोजी पंढरपुर प्रवेश करेल. मुक्कामासाठी संस्थानच्या धर्मशाळेत खात चौक येथे राहुन दि. 13 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघेल.