Kashi Vishwanath : असं म्हटलं जातं कि काशीला गेल्यानंतर आयुष्यातील सर्व तीर्थयात्रा संपन्न होतात. काशीच्या बाबा विश्वनाथांचे दर्शन घेण्यासाठी भाविक इथे पूर्वीपासून येत आहेत, मात्र मागच्या दोन वर्षांचा विचार केला तर काशीमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत. आणि याचाच फायदा हा त्याठिकाणच्या अर्थव्यवस्थेला होताना दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरला सुरु होऊन आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांत काशीतील भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या तब्बल 13 कोटींच्या पुढे गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. काशीत वार्षिक उलाढाल 20,000 कोटींच्या पुढे गेली आहे. काशीमध्ये (kashi) विमानतळापासून रेल्वे आणि रोडवेपर्यंत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत.
दर्म्य, काशीतील बदलांविषयी तज्ज्ञांनी,”काशी हे पर्यटन केंद्र म्हणून वेगाने प्रगती करत आहे. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये सुमारे 4.5 कोटी पर्यटकांनी काशीला भेट दिली होती. यावर्षी या संख्येत वाढ होऊन 5 कोटींच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर धर्मशाळा आणि हॉटेलच्या खोल्या देखील सामान्यतः रिकाम्या राहणार नाहीत. एकट्या बनारसमध्ये फक्त 1000 नोंदणीकृत हॉटेल्स आहेत.
काशी विश्वनाथ धामने बनारसच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. या धाममुळे सरकारच्या महसुलात 65 टक्क्यांची जोरदार वाढ नोंदवण्यात आली आहे. टुरिझम वेल्फेअर असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी येथील वार्षिक उलाढाल सुमारे 250 कोटी रुपये होती, ती यंदा 300 ते 350 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. काशीच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसह, कारागीर, हॉटेल क्षेत्र, लाकूडकाम, पर्यटन यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळत आहे. त्याचबरोबर बनारसी साडीच्या व्यवसायातही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या निर्मितीमुळे बनारसच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे. येथील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 9 वर्षांत पर्यटकांच्या संख्येत सुमारे 10 पटीने वाढ झाली आहे. या वाढीचा फायदा येथील व्यावसायिकांनाही झाला. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. केवळ कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या पर्यटकांमुळे अर्थव्यवस्थेला वर्षाला 8 ते 10 हजार कोटी रुपयांचा फायदा मिळत आहे.
काशीमध्ये रोजगाराच्या बाबतीत बोलायचे झाले तर पर्यटन क्षेत्राला सर्वाधिक चालना मिळाली आहे. आकडेवारीनुसार, या क्षेत्रातील रोजगारामध्ये 34 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर बनारसी कापड व्यापारी, हॉटेलमालक, बोटीचालक, पांडे-पुजारी, ट्रॅव्हल एजंट, ई-रिक्षा, ऑटो आणि टॅक्सी चालक, पूजा साहित्य विक्रेते, पथारी विक्रेते, छोटे व्यापारी यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. या भागात पायाभूत सुविधांचा विकास होत असल्याने छोट्या व्यावसायिकांनाही फायदा होत आहे. मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असल्याचा फायदा छोट्या व्यावसायिकांना होत आहे. घाट व्यवस्थापनाचे काम वाढल्याने येथे लोकांना रोजगारही मिळत आहे. फुलांच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षभरात 40 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.