बेळगाव – छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहे, असे वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी केले आहे.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात संमिश्र सरकार आहे. कॉंग्रेस केव्हा आपल्याला खुर्चीवरून उतरवेल याची भीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. त्या कारणासाठी आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत, असे देखील कार्जोळ म्हणाले.
ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी इतिहास वाचलेला नाही. त्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे आहेत. त्यांचे मूळ पुरुष बेळीअप्पा आहेत. कर्नाटकात दुष्काळ पडला म्हणून ते महाराष्ट्रात गेले. नंतरच्या पिढीतील शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत, असे गोविंद कार्जोळ म्हणाले.
कर्नाटकात मराठी, कन्नड जनता प्रेमाने राहते. जात मराठा असली तरी ते कन्नडच आहेत. महाराष्ट्रात देखील कन्नड मराठी जनता प्रेमाने राहते. उध्दव ठाकरे यांनी खुर्चीसाठी वातावरण बिघडवायचे काम करू नये, असे गोविंद कार्जोळ म्हणाले.