जेजुरी/जवळार्जुन : पुरंदर तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असताना सोमवारी संध्याकाळी झालेल्या अती मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीला महापूर आला होता, या पुराच्या पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतकरी अजित व्यंकट शिंदे (वय 35 रा. पांडेश्वर) हा तरुण शेतकरी नदीच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
जेजुरी जवळील नाझरे (मल्हार सागर) जलाशयातून पहाटे 35 हजार तर सकाळी 10 वाजल्यापासून सुमारे 30 हजार क्युसेकने कऱ्हा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होता; मात्र दुपारी 12 वाजेनंतर सायंकाळपर्यंत 7600 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्याने कऱ्या नदीला सकाळी महापूर आला होता, त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात 70 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, परिसरातील सर्व ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे सर्व नदीपात्रातील पुलावरून एक ते दीड फूट उंचीवरून पाणी वाहत होते, त्यामुळे जेजुरीवरून नाझरे सुपे, नाझरे कडेपठार, पांडेश्वर, मावडी, पिंपरी, नायगाव, राजुरी या गावांना जाणारा संपर्क संपूर्ण दिवसभर तुटला होता.
बरेचसे पूल पाण्याखाली गेल्यामुळे त्यांचे भराव देखील खचले आहेत, त्यामुळे नदी पात्रातील जेजुरी, नाझरे सुपे, व कडेपठार आणि नाझरे सुपे, जवळार्जुन, पांडेश्वर यांना जोडणारे तसेच पांडेश्वर-नायगाव-पांडेश्वर सुपा यांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले होते. पुलावरून चार ते पाच फूट उंचीने पाणी वाहत होते. पांडेश्वर गावाला पिंपरीवरून येणारा ओढा आणि कऱ्हा नदी यांच्या पाण्याने पूर्ण वेढले असल्यामुळे संपूर्ण गावाने सोमवारची रात्र जागून काढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मागील दोन वर्षांपूर्वी ढगफुटीसदृश पावसापेक्षाही मंगळवारी (दि. 18) नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे दुग्ध व्यवसायिक त्याचबरोबर शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थांना देखील परीक्षा असून सुद्धा त्या ठिकाणी रस्त्यामुळे परीक्षेला जाता आले नाही. नैसर्गिक मोठ्या प्रमाणावर आलेल्या पुरामुळे यशवंत विद्यालय भागशाळा पांडेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडेश्वर, रोमनवाडी या विद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.
जवळार्जुन पूल दरवर्षी होतो बंद
कऱ्हा नदीवरील जवळार्जून पूल पावसामुळे दरवर्षी एक ते दोन महिने वापरता येत नाही हा रस्ता भुलेश्वर, पांडेश्वर, जवळार्जुन, कोळविहिरे, वाल्हे, वीर या धार्मिक तीर्थक्षेत्र असणाऱ्या गावांना जोडला जातो. या रस्त्याचा उपयोग ऊस वाहतूक विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी दुग्धव्यवसाय फळे, भाजीपाला यासाठी सोयीस्कर असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी व्यावसायिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
जवळार्जुन-पांडेश्वर या गावांना जोडणाऱ्या पुलांची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तातडीने करण्यात आली आहे. हा पूल नाबार्डच्या अर्थसाहाय्यातून करण्यात येणार आहे.
– माणिकराव झेंडे पाटील, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पुरंदर तालुका