पुणे, दि. 18 (उपनगर टीम) – शहर तसेच उपनगरांत परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. उपनगरांतील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. पावसामुळे गेल्या आठवडाभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच या पावसामुळे उपनगरांतील संपूर्ण ड्रेनेज सिस्टिमच पूर्णपणे निष्क्रिय असल्याची बाब समोर आली आहे. यात नक्की कोणाच्या चुका आहेत किंवा काय बदल होणे अपेक्षित आहेत, याबाबत आजी-माजी नगरसेवकांसह सामाजिक संस्थांनीही मनपा आयुक्तांकडे कार्यवाहीची मागणी केली आहे.
शहर तसेच उपनगरांत गेल्या काही दिवसांमध्ये जो पाऊस पडत आहे. याला शास्त्रीय तसेच प्रशासकीय कारणेही जबाबदार आहेत. शास्त्रीय कारणांमध्ये ग्लोबल वॉर्मिंग, यातून ढगफुटीचे वाढलेले प्रमाण तर प्रशासकीयमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली टेकडी फोड, वृक्षतोड त्यामुळे माती वाहून येणे, सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे रस्ते यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास जागाच नसणे, अशी कारणे सांगितली जात आहेत.
उपनगरांतील ओढे-नाले पूर्णपणे प्रशासन आणि राजकीय स्वार्थापोटी बुजवले गेले आहेत. 2014 मध्ये “टेरी’ या संस्थेने महाराष्ट्र शासनाला “लेखी रिपोर्ट’ सादर करीत या अहवालामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, 2030 पर्यंत पावसाचे प्रमाण पुण्यामध्ये 32 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. या अहवालाबाबत पालिका आणि आयुक्तांना माहिती असूनही त्यानुसार कोणत्याही प्रकारचे काम शहर, उपनगरांत झाले नसल्याचे माजी नगरसेवकांकडून सांगण्यात आले. याबाबत आयुक्तांनी आजी-माजी नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करावे, अशीही मागणी होत आहे.
नदीकडे पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या “स्ट्रॉंम वॉटर ड्रेन सिस्टिमचे मेंटेनन्स’ (पावसाळी वाहिन्या) झालेले नाही. मुळातच त्याचे डिझाइन अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेले आहे. शहर, उपनगरांत पावसाळी नियोजनासंदर्भात जी काही विकासकामे म्हणून करण्यात आली त्यात तांत्रिक मुद्दे गांभीर्याने घेतलेले नाहीत. नदीकाठ विकास योजना प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये नदीची रुंदी कमी होऊ शकते, असे झाले तर आतापेक्षाही मोठी भयावह स्थिती शहर तसेच नदीलगतच्या उपनगरीय भागात निर्माण होऊ शकते.
-सारंग यादवडकर, अभ्यासक, टाऊनशिप मॅनेजमेंट
–