कोंढवा :भैरोबानाला ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी भिंत फुटून शांताई भाजी मंडईमध्ये शिरल्याने महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाच्या समोर चार ते पाच फूट पाणी वाढले होते. यामुळे पोहण्यास आलेली सहा मुले, दोघे पालक आणि चार कामगार जलतरण तलावात अडकून पडले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने तेथून सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
कोंढव्यातील पालिकेच्या जलतरण तलावात स्पर्धात्मक पोहण्याच्या शर्यतीमध्ये सहभाग घेणारी 20 मुले दररोज रात्री 8:00 वाजता सरावासाठी जलतरण तलावामध्ये येतात. सोमवारी पाऊस असल्यामुळे 20 पैकी आठजणच आले होते, त्यांचा सराव सुरू असताना मुसळधार पावसामुळे जलतरण तलावाबाहेरील शांताई भाजी मंडईमध्ये भैरोबानाला ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी शिरले.
काही वेळातच परिसरात व जलतरण तलावासमोर चार ते पाच फुटापर्यंत पाणी साचले. तलावामध्ये काम करणारे कामगार रामदास माने, अनिरुद्ध यादव, सोनू यादव, निशिकांत मंडलिक यांनी सर्व मुलांना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एकत्र आणले.
पाणी व पाऊस कमी होण्याची वाट पाहात होते. मात्र, पाऊस कमी होण्याऐवजी वाढत होता. अखेर, याबाबत अग्निशमन दलास कळविण्यात आले. मध्यरात्री एकच्या सुमारास फायरमन निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, अनिकेत गोगावले, सुरज माळवदकर, सागर इंगळे, दिपक कचरे या जवानांनी अंधारातून बॅटरीच्या प्रकाशात दोरीच्या सहाय्याने सर्व मुलांना, त्यांच्या पालकांना व कामगारांना सुखरूप बाहेर काढले.
तलाव परिसरात पाणी साचल्याने आतील मुले, पालक बाहेर पडू शकत नसल्याचे समजल्यानंतर तातडीने घटनास्थळी पथक गेले. पाणी मोठ्या प्रमाणात साचले असल्याने दोरीच्या सहाय्याने जवान त्यांच्यापर्यंत पोहोचला त्यानंतर एका-एकास बाहेर घेण्यात आले.
– निलेश लोणकर, फायरमन,