अवसरी – तांबडेमळा गावाला पाणीपुरवठा करणारा काळदरा पाझर तलाव गेल्या सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यापासून कोरडा पडला आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावात गेल्या तीन महिन्यांपासून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसाआड किंवा तीन दिवसांतून एकदा गावातील वाडी-वस्तीवर पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
अवसरी खुर्दचा विचार केला तर तालुक्यात लोकसंख्ये बाबत तिसऱ्या क्रमांकाचे गाव आहे. परंतु, सद्यस्थितीत पाच महसुली गावे तयार झाली आहेत. त्यात तांबडेमळा वेगळी ग्रामपंचायत झाली आहे. तांबडेमळा ग्रामपंचायत ही पुणे-नाशिक महामार्गाच्या पश्चिमेस आहे. या ग्रामपंचायती अंतर्गत लंकेमळा-तांबडेमळा, इनामवस्ती, चिमनवाडी आदी वस्त्या येतात. सुमारे बाराशे ते पंधराशे लोकवस्तीचे हे गाव आहे. तांबडेमळ्याच्या पश्चिमेस काळदरा या मातीच्या पाझर तलावाचे सुमारे 40 ते 45 वर्षांपूर्वी काम पूर्ण झाले. या तलावात डोंगर माथ्यावरून वाहत येणारे पाणी यात साठून पावसाळ्यानंतर जमिनीत झिरपून परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होत असते. तांबडेमळा ग्रामपंचायत हद्दीच्या पूर्वेस पुणे-नाशिक महामार्गाच्या पूर्वीकडे डिंभे धरणाचा उजवा कालवा गेला आहे. गाव पश्चिमेला असल्यामुळे या पाण्याचा काहीही फायदा तांबडेमळा गावाला होत नाही. त्यामुळे गावाला फक्त पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहवे लागते. यापूर्वीही ग्रामस्थांनी डिंभे उजव्या कालवा नजीक पर्यायी जागा शोधून पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न केला होता; परंतु विहिरीसाठी जागा उपलब्ध न झाल्याने विहिरीचे स्वप्न पूर्ण झाले नाही.
या दुष्काळी परिस्थितीत आंबेगाव तालुक्याच्या अनेक भागात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अवसरी खुर्दच्या तांबडेमळा भोरवाडीचा पश्चिम भाग, कराळेवाडी या भागात उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचे दुर्भक्ष्य जाणवते. कारण डिंभे उजव्या कालव्यापासून ही वस्ती पश्चिमेस उंचावर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात डिंभे उजव्या कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडले तरी या भागातील जनतेला काही फायदा होत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत तांबडेमळा भागात दररोज दोन टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचे टॅंकर सार्वजनिक विहिरीत सोडून ते तांबडेमळा येथील वस्तीला पाणीपुरवठा केला जातो. तांबडेमळा वस्तीचे तीन भाग होतात. त्यामुळे दररोज एका वस्तीला या प्रमाणे टॅंकरद्वारे आलेले पाणी विजपंपाच्या साह्या ने वितरित केले जाते. त्यामुळे जवळपास दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला थोडेफार पाणी उपलब्ध होते ते स्वतःसाठी वापरत आहेत तर अनके शेतकऱ्यांना टॅंकरवरील पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे.
गावच्या पश्चिमेस काळदरा पाझर तलाव असून ही दर वर्षी शासनाला टॅंकरच्या साह्याने उन्हाळ्यात पाणीपुरवठा करावा लागत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी या पाझर तलावाचे काम करण्यात आले होते. परंतु; तलावाच्या भितीखालून पाण्याची गळती होत असल्याने तलाव भरला तरी दोन महिन्यांत पाणी कमी होत जाते आणि जानेवारीच्या आसपास तलाव कोरडा पडतो. या तलावाची व्यवस्थित डागडुजी केल्यास शासनाचा पाणी पुरवठ्यावर होणारा खर्च वाचेल. पाणी साठवणुकीसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.