नवी दिल्ली – पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना शनिवारी पाकिस्तान पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारातच अडवून धमकावल्याची घटना घडली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘झिंगलेली माकडे’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.
या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी पाकिस्थानवर टीकेचा वर्षाव केला आहे. ‘पाकिस्तानला नेतृत्व नाही, दिशा नाही म्हणून इस्लामाबादला शनिवारी घडले तसे प्रकार घडतात. दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीवर हिंदुस्थान सरकारने नियंत्रण आणले. कारण त्या पार्टीत कश्मीरातील फुटीरतावाद्यांसाठी पायघड्या घातल्या होत्या.
हिंदुस्थानच्या सार्वभौम स्वातंत्र्यास आव्हान देणाऱ्यांना पाक उच्चायुक्त शिरकुर्मा खिलवणार असतील तर त्यांना रोखावे लागेल, पण इस्लामाबादमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी असे काहीच केले नव्हते. म्हणूनच आम्ही म्हणतो, पाकिस्तानी माकडांनी दारू पिऊन तमाशा केला. सरकारने हा तमाशा विसरू नये’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना शनिवारी पाकिस्तान सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास नकार दिला होता. याप्रकरणी भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला होता.