नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षपदासाठी पक्षाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असले तरी अजूनही पक्ष कोणत्या निर्णयापर्यंत पोहचला नसल्याचे दिसत आहे. त्यातच आता कॉंग्रेसचे वरीष्ठ नेता ज्योतिरादीत्य सिंधीया यांनी या निवडीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षासाठी सध्या कठिण काळ सुरू असला तरी पक्ष लवकरच या परिस्थितीतून बाहेर पडणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच पक्षाला पुन्हा एकदा पुनर्जिवीत आणि परिवर्तीत करण्याची गरज असल्याचेही मत सिंधीया यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भोपाळच्या दौऱ्यावर असणाऱ्या ज्योतिरादीत्य सिंधीया यांनी अध्यक्ष निवडीबाबत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. पक्षाच्या अध्यक्षपदी अशा व्यक्तीची गरज आहे जी व्यक्ती पक्षाला मजबूत करून देशातील सर्व कार्यकर्तांना एकत्र ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल, असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच राहुल गांधी यांनी पक्षाचाच नव्हे तर देशातील जनतेचा विचार करत लढा दिला ते कधी अशा प्रकारे पक्षाचे अध्यक्षपद सोडतील असे आम्हाला कधीच वाटले नव्हते असेदेखील सिंधीया यांनी यावेळी म्हटले. तसेच वेळ हातातून निघून जात आहे त्यामुळे पक्षाने आपल्या अजेंड्यावर नाही तर अध्यक्षपदाच्या निवडीवर लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.