मुंबई :- वाघाचे कातड पाघंरुन लांडगे निघाले आहेत, असे कोणी तरी म्हणत आहे. तुमची ही कोल्हेकुई ही वाघाची डरकाळी फोडेपर्यंतच असते. 20 जून हा क्रांतीदिन आहे. स्वाभीमान दिन आहे. ही क्रांती करण्यासाठी वाघाचे काळीज लागते, अशी रोखठोक भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्हीच गद्दारी केली. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि कॉंग्रेससोबत गेले. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना धोका दिला, मतदारांच्या विश्वासाला तडा दिला त्यांना सहानुभूती मिळणार नाही.
आम्ही जर गद्दारी केली असती तर 50 आमदार, 13 खासदार आमच्यासोबत आले नसते. आम्ही स्वाभीमान दाखवला आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे. बाळासाहेबांचा धनुष्यबाण गहाण टाकला होता, तो आम्ही सोडवला आणि पुढे घेऊन चाललो आहे. सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला आहे.
कोणाला रिक्षावाला, पानटपरीवाला, भाजीवाला असे हिणवले जात आहे. याच सामान्य लोकांना घेऊन बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना मोठी केली. शिवसेनेसाठी किती लोकांनी जेल भोगली. कितीतरी लोकांचा शिवसेनेसाठी जीव गेला. तेव्हा तुम्ही कुठे होते? किती केसेस झाल्या तुमच्यावर? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला. तसेच आम्ही आरोपाला उत्तर कामाने देणार. उठसूट एकच कॅसेट तिकडे वाजत आहे. त्यांनी स्क्रिप्ट रायटर बदलावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
पहिले मुख्यमंत्री सोबत पेनच ठेवत नव्हते. मी दोन-दोन पेन सोबत ठेवतो. ठाण्यात सही करतो. सह्याद्रीत सही करतो. वर्षावर सही करतो. हे गतीमान सरकार आहे. काम करणारे सरकार आहे. मला रिक्षावाला म्हणत होते. याच रिक्षावाल्याने तुमची मर्सिडीज खड्ड्यात टाकली. हे सर्वसामान्य लोक सोबत घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली आहे. ज्यांना ज्यांना तुम्ही हिणवता, ते तेवढ्याच त्वेषाने काम करत आहे. जनता सूज्ञ आहे. ते पाहात आहेत.
बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदूत्वाचे विचार राज्यात पुढे नेण्याचे काम ही शिवसेना करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करत उद्धव ठाकरे अडीच वर्षांत फक्त दोन वेळाच मंत्रालयात गेले, असा टोलाही त्यांनी लगावला.