मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत साडे बारा हजार कोटींचा घोटाळा झाला. त्यांच्या तिजोरीत गेलेला प्रत्येक पैसे आमचं सरकार परत आणेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. कल्याण येथे आयोजीत मेळावा पार पडला या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
या कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. देवेद्र फडणवीस म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरेंचा पर्दाफाश करायचे ठरवले आहे. आजच मुंबई महानगरपालिकेबाबतचा कॅगच्या अहवाल समोर आला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मुंबई महापालिकेत साडेबारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे.
यामुळे आजच एकनाथ शिंदेंनी यावर एसआयटी स्थापन केली आहे. या एसआयटीच्या माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही (उद्धव ठाकरे) तुमच्या तिजोरीत नेला, त्यातील प्रत्येक पैसा परत आणण्याचे काम आमचे सरकार निश्चितपणे करेल.
तसेच महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर एका वर्षात राज्यात परिवर्तन घडवण्याचे काम आमच्या सरकारने केले. महाविकास आघाडीने अडीच वर्षाच्या काळात एमएमआरडीच्या क्षेत्रात एकही काम केले नाही. येथील सगळ्या योजना आम्ही केल्या. महाविकास आघाडी एक पैशाचीही योजना आणू शकली नाही,अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.