सोशल मिडीयावर आज प्रत्येकजण ऍक्टिव्ह आहे. पण जॉन अब्राहमला सोशल मिडीयाचा वैताग आला आहे. आता या सोशल मिडीयाला अलविदा म्हणण्याचा जॉन विचार करायला लागला आहे. सोशल मिडीयावर इतके लोक ऍक्टिव्ह असतात. मात्र 10 पैकी 9 लोकांना “ते नक्की कोणत्या विषयावर बोलत आहेत.’हेच मुळात माहिती नसते. लोक अज्ञानी असतात. त्यांच्यामध्ये जागरुकताच नसते, असे जॉन म्हणाला.
सोशल मिडीयावर चांगलेही लोक आहेत. पण ते बिनडोकपणे काहीही चर्चा करत नाहीत. मात्र बहुतेकजण जाती, धर्म, समुदायाशी संबंधित चर्चा करत असतात. या चर्चेत काहीही पॉझिटिव्ह नसते. आपण जर अर्धा तास रोज सोशल मिडीयावर घालवला तरी आजारी पडू, असे जॉन म्हणाला.
न्यूज चॅनेलवरच्या बातम्यांनाही तो वैतागला आहे. 5 मिनिटांमधील 25 बातम्यांमधील 24 बातम्या खून, बलात्कार, पूर, दंगली आदींच्याच होत्या. यामध्ये काहीही सकारात्मक नाही, असे जॉन म्हणाला. कलाकार म्हणून सोशल मिडीयावर ऍक्टिव्ह रहायला लागते. वर्ष-दिड वर्षापूर्वी आपणही सोशल मिडीयाचे ऍडीक्ट झालो होतो.
मात्र आता हळूहळू सोशल मिडीयापासून लांबच रहायचे जॉनने ठरवले आहे. एक दिवस असा येईल की सगळे सेलिब्रिटीज सोशल मिडीयाला अलविदा म्हणतील.