Jayant Patil on Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेमध्ये पडलेली फूट व त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेलेली शिवसेना हा प्रकार राज्याने नुकताच पाहिला. असाच प्रकार आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडताना दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार समर्थकांचा गट सत्ताधारी भाजपसोबत गेला असून आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाचे देखील दरवाजे ठोठावले आहेत. अशातच अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
काय म्हणाले जयंत पाटील? | Jayant Patil on Sharad Pawar
‘शरद पवार यांनी एखाद्यावर विश्वास टाकल्यास त्याला दिलेल्या जबाबदारीत किंवा कामामध्ये ते कधीही हस्तक्षेप करीत नाहीत. पक्षामध्ये देखील शरद पवार यांनी एवढी मोकळीक दिली की परिस्थितीच बिघडून गेली’, अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. शरद पवारांसमोरच जाहीर सभेत जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केल्याने ते अनेकांच्या भुवया उंचावणार ठरलं. ते अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे? | Jayant Patil on Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होण्यापूर्वी अजित पवार विरुद्ध जयंत पाटील असा पक्षांतर्गत वाद असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या होत्या. पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांमध्येही दोघांमध्ये धुसफूस असल्याचं अनेकदा निदर्शनास आलं होत. अशातच आज जयंत पाटील यांनी पक्षातील परिस्थिती बिघडली असं सांगताना त्यांचा रोख अजित पवार यांच्याकडेच होता काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
भाजपचे मिशन बारामती…
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ५१ टक्के मतांसह विजय प्राप्त करू असा विश्वास आज (गुरुवार) व्यक्त केला. बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना, २०१९ मध्ये बावनकुळे यांचे तिकीट त्यांच्याच पक्षाने कापले असल्याची आठवण करून दिली.
सविस्तर वृत्त – मोठ्या पवारांचं अजितदादा गटाच्या आनंदावर विरजण टाकणारं वक्तव्य….
अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नचं
शरद पवार यांनी आज (गुरुवार) अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे स्वप्न आहे आणि स्वप्नच राहील असं म्हणत शरद पवार यांनी टोला लगावला.
सविस्तर वृत्त – बावनकुळेंना बारामती जिंकण्याचा विश्वास, शरद पवारांनी करून दिली ‘नकोशी’ आठवण…