Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी झालेल्या दोन दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबाचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांच्या तपासातील ही माहिती दिली आहे. यापैकी एक जानेवारी महिन्यात राजौरी गावात झालेला हल्ला होता ज्यात ७ नागरिक ठार झाले होते आणि दुसरा हल्ला पुंछ जिल्ह्यात झाला होता, जिथे लष्कराच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते.
जम्मू-काश्मीरमधील पहिला दहशतवादी हल्ला १ जानेवारीच्या रात्री राजौरीतील धनगरी गावात झाला, ज्यामध्ये ५ जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी, आदल्या रात्री घरात पेरलेल्या आयईडीचा स्फोट होऊन आणखी दोन लोक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी दोन दहशतवाद्यांनी आयईडी पेरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सुरुवातीला राजौरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु नंतर एनआयएने त्याचा ताबा घेतला. तपासादरम्यान दोन्ही हल्लेखोरांना स्थानिक लोकांकडून मदत केल्याचे एनआयएला आढळून आले.
सप्टेंबरमध्ये एनआयएने पूंछ जिल्ह्यातील निसार अहमद आणि मुश्ताक हुसेन नावाच्या दोघांना धनगरी हत्याकांडात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून अटक केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर निसार हा लष्कर-ए-तैयबाचा हस्तक अबू कताल उर्फ कताल सिंधी याच्या सतत संपर्कात असल्याचे एनआयएला समजले. ओव्हरग्राउंड वर्कर निसारला आधी अटक करण्यात आली.
सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत दोन वर्षे कोठडीत राहिल्यानंतर 2014 मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली. निसार हा गेल्या दोन-तीन वर्षांपासून माहिती देणारा म्हणून काम करत होता आणि धनगरी येथील हल्ल्यानंतर त्याला स्थानिक पोलिसांनीही बोलावले होते. त्याने तपासकर्त्यांना सांगितले की, घटनेनंतर कतालने त्याला दोन दहशतवाद्यांना राहण्याची सोय करण्यास सांगितले होते आणि त्याने मुश्ताक हुसेनला 75,000 रुपये दिले होते आणि एका गुहेत लपून बसण्यास सांगितले होते. निसार त्यांना घरचे जेवण पुरवत असे.