गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर सुरक्षा दलास सतर्कतेचे आदेश
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरविषयीचे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्यापासून भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांच्या कुरापतीत वाढ झाली आहे. दिवसेंदिवस दहशतवादी देशात हल्ला करण्यासाठी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता आणखी भर पडली आहे म्हणजेच सीमारेषेवर 24 दहशतवादी फिरताना दिसले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आली आहे. तसेच त्यामुळे सुरक्षा दलास सतर्कतेचे आदेश यंत्रणेकडून देण्यात आले आहेत.
सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे. श्रीनगर आणि आसपासच्या परिसरातील दुकानदारांना घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी धमकी दिली आहे त्यामुळे सुरक्षा दलाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच राज्यातील जनतेला हे दहशतवादी भडकावण्याचे काम करणार नाहीत याची काळजी सुरक्षा दल घेणार आहे त्यासाठी सुरक्षा दलास सतर्क राहण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे पोलिस प्रमुख दिलबाग सिंह यांनी राज्यात दहशतवादी दिसल्याची बातमी फेटाळता येत नाही परंतू, ते उघडपणे राज्यात फिरतात ही अतिशयोक्ती असल्याचे म्हटले आहे.