नवी दिल्ली :- जम्मू आणि काश्मीरमधील गुलामनबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आघाडीच्या 20 हून अधिक नेत्यांनी, आज कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी गुलामनबी आझाद यांच्या राजकीय भूमिकेवरही जोरदार टीका केली.
पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, गुलामनबी आझाद यांना कॉंग्रेसचे खासदार असताना मिळालेला दिल्लीतील बंगला टिकवण्यासाठीच त्यांनी पक्षाशी द्रोह केला. त्यांना त्यांच्या दिल्लीतील विस्तीर्ण बंगल्यात दीर्घकाळ राहण्यासाठी मोदी सरकारकडून उदारपणे मुदतवाढ दिली गेली आहे. त्याचे औचित्य काय होते हे स्पष्ट झाले पाहिजे.
या नेत्यांच्या घरवापसीच्या कार्यक्रमाच्यावेळी खर्गे यांच्याखेरीज एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, एआयसीसीच्या प्रदेश प्रभारी रजनी पाटील आणि जम्मू-काश्मीर कॉंग्रेसचे प्रमुख विकार रसूल वाणी हेही उपस्थित होते.
आज पक्षात पुन्हा परत आलेल्या नेत्यांमध्ये यशपाल कुंडल, जेकेपीसीसीचे माजी उपाध्यक्ष हाजी अब्दुल रशीद दार, नरेश के. गुप्ता , शामलाल भगत, नम्रता शर्मा, सायमा जान, शाहजेहान दार, फारुक अहमद, तरनजीत सिंग टोनी, गझनफर अली, संतोष माजोत्रा आदींचा समावेश होता. या आधीही आझाद यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे गुलामनबी आझाद स्वतःच्या पक्षातच एकाकी पडले आहेत.