नवी दिल्ली – राज्यसभेत नॅशनल कॅपिटल दिल्ली टेरिटरी गव्हर्नमेंट अमेंडमेंट बिल-2023 वर झालेल्या चर्चेदरम्यान, कॉंग्रेस पक्ष आम आदमी पक्षाच्या समर्थनार्थ बोलताना दिसला. याच पक्षाने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडून ‘भारतरत्न’ काढून घेण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. जाणकारांनी याला राजकीय मजबुरी म्हटले आहे.
राज्यसभेतील चर्चेत भाग घेताना भाजप खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी आप आणि कॉंग्रेस यांच्या युतीवर खिल्ली उडवली. ते म्हणाले, आम आदमी पार्टीने गुजरातमध्ये कॉंग्रेसला नेस्तनाबूत केले आणि पंजाबमध्येही संपवले. मे महिन्याच्या मध्यावर 16 आणि 17 तारखेच्या रात्री दक्षता विभागाच्या 76 फाईल्समध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने या विषयावरील अध्यादेश आणण्यात आला आहे.
विरोधी पक्षांची आघाडी कमकुवत करून कॉंग्रेस पक्षाला कलंकित व्हायचे नव्हते. या विधेयकावर कॉंग्रेस पक्षांतर्गत एकमत नव्हते. या प्रस्तावावर अजय माकन यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याच्या विरोधात होते. असे असतानाही कॉंग्रेसने ‘आप’ला पाठिंबा दिला.