मुंबई : औरंगाबादच्या नामांतर करण्याच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व काँग्रेसवर टीका केली असून ही नाटक कंपनी असल्याची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असेही त्या म्हणाल्या आहेत.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. “औरंगाबादचे संभाजीनगर मुळात हा विषय वादाचा नाही. संभाजीनगरचा प्रस्ताव आधीच ठेवलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुखही आहेत. महाविकास आघाडीतील घटक, संभाजीनगरच्या स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल यामध्ये शंका नाही. पण काही लोक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणेकरांनी विद्यापीठाचे नामांतर आनंदाने स्वीकारले होते. मी उपसभापती असल्याने पुण्याच्या नामांतराबाबत कोणतीही एक भूमिका घेऊ शकत नाही,” असे निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
“सरकारवर टीका करणं हेच विरोधी पक्षाच्या नेत्यांचं काम आहे. जर त्यांनी टीका केली नाही तर ते नाटक कंपनीतीलच एक पात्र आहेत का अशी शंका वाटेल. प्रेक्षक म्हणून ते चांगली भूमिका निभावत आहेत. आमच्या भूमिकेवर शंका घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना धक्का बसला आहे. मी परत येईन ऐवजी आता परत जायची वेळ आली आहे,” असं उत्तर निलम गोऱ्हे यांनी फडणवीसांच्या टीकेला दिला.
“शक्ती कायदा अजून मंजूर झालेला नाही. त्यामुळे जुन्या गुन्ह्यावर हा कायदा लागू होणार नाही. त्या पीडित महिलेचा पत्ता चुकीचा आहे. तिचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप होणार नाही. त्या महिलेने पुढे येऊन सगळे पुरावे द्यावे, कारवाई केली जाईल,” असं आश्वासन निलम गोऱ्हे यांनी दिलं. “जिलेबी फाफडाचा विषय आत्ताचा नाही. मी मुंबईकर ही मोहीम उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच सुरू केली आहे. त्यात सर्व प्रकारचे लोक सहभागी झाले. गुजराती भाषिक मराठी समाजाबरोबर मिसळले आहेत. महाराष्ट्राला कर्मभूमी मानतात त्यांनी विरोध केलेला नाही,” असं निलम गोऱ्हे यांनी सांगितलं.