पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – अदखलपात्र गुन्हयात आरोपीला पोलीस अटक करत नाहीत, म्हणून युवकाने वाघोली येथे चौकीच्या आवारातच पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये तो ९० टक्के भाजला आहे. ही घटना मंगळवारी घडली. दरम्यान, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. रोहिदास अशोक जाधव(२८, रा.वाघोली) असे या नागरिकाचे नाव आहे.
लोणीकंद ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत कायंगुडे यांनी सांगितले, की एका सोसायटीतील दोन रहिवाशांमध्ये पार्किंगच्या जागेवरुन वाद होते. दोघांनेही एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गुन्हयात समोरील व्यक्तीस अटक करावी, अशी मागणी करत जाधव याचे कुटूंब वाघोली चौकीत सकाळी आले. त्यांना पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यात अटक करता येत नाही, असे समजावून सांगितले. मात्र, तक्रार दाखल करुनही आरोपीला अटक होत नाही असा समज करुन जाधव यांनी पेटवून घेतले. पोलीस आणि नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णलयात दाखल केले.