मुंबई: देशांतर्गत विमान वाहतूक 25 मे पासून नियंत्रित पद्धतीने सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही उत्सुकता आहे. मात्र विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोध दर्शविला आहे.
यासंदर्भात त्यांनी मध्यरात्री ट्वीट करत विमानसेवा सुरु करणे धोक्याचे ठरेल, असे म्हटले आहे. रेड झोनमधील विमान सेवा अशा परिस्थितीत सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. स्वॅबशिवाय प्रवाशांचे नुसते थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे.
रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे.स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंग चा काय फायदा? सद्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव प्रवाशाला रेड झोन मध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 23, 2020
ग्रीन झोनमधील प्रवाशांना रेड झोनमध्ये आणून प्रादुर्भाव वाढण्याचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना करोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, 25 मार्चपासून देशातली विमान सेवा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. सुरुवातीला सरकार देशांतर्गत वाहतूक 33 टक्के क्षमतेने पूर्वपदावर आणणार आहे. त्यासाठी विशेष नियमावलीही सरकारने जाहीर केलेली आहे. देशाबाहेर अडकलेल्या नागरिकांसाठी सरकारचे “वंदे भारत मिशन’ सध्या सुरू आहे. पण आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीस मात्र सरकारने अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही.