पुणे(प्रतिनिधी) – पैसे परत देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून कोयत्याने वार करणाऱ्या सराईतासह तिघांना कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. मंगेश अनिल माने (वय 24, रा. बिबवेवाडी), अंकीत आद्रेंश भोसले (वय 20), आदित्य शांताराम तणपुरे (वय 20, दोघेही, रा. गोकुळनगर, कात्रज) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलालाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले आहे.
गुन्ह्यात वापरलेल्या दोन गाड्या आणि दोन लोखंडी कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत. 20 मे रोजी ही घटना घडली होती. याबाबत रोहन प्रताप कामठे (वय 23, रा. टिळेकनगर, कोंढवा) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी मित्र अक्षय आवारे याच्यासोबत टिळेकरनगर येथून गोकुळनगर येथे चालला होता. त्यावेळी तिघांनी फिर्यादी आणि मित्राला कोयत्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले.
याबाबत कोंढवा पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सापळा रचत कारवाई करत तिघांना अटक केली. दरम्यान तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, तपास पथकातील अंमलदार संतोष नाईक, अमित साळुंके, ज्योतिबा पवार, नीलेश वणवे, संजीव कळंबे, आदर्श चव्हाण यांनी ही कारवाई केली.