अमरावती, – देशातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. यापूर्वी शेतकऱ्यांना कधीही अशाप्रकारची वागणूक मिळाली नव्हती. आता या देशात मोगलाई आली आहे का, असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.
अमरावती येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या भूमिकेवर ताशेरे ओढले. केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीचे अनुदान बंद केले. शेतकऱ्यांना मिळणारे दीड लाख रुपयांचे तसेच कंटेनरच्या भाड्याचे दोन लाख रुपयांचे अनुदान बंद केले. एकूणच केंद्र सरकार शेतकरीविरोधी भूमिका का घेत आहे, हे कळायला मार्ग नाही. पण शेतकऱ्यांची अशी अडवणूक खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
शरद पवार यांनी यू टर्न घेतला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला. यावर प्रत्युत्तर देत अजित पवार म्हणाले, ज्या ठिकाणी शेतमालाचे भाव आधारभूत किमतीपेक्षा कमी असतील तर त्यात केंद्राने सुधारणा करावी, असे पवार साहेबांचे मत होते. शरद पवार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूनेच विचार करत आलेले आहे. म्हणूनच शरद पवार साहेबांना शेतकऱ्यांचे नेते म्हटले जाते, असे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, अदानी उद्योसमूहाचे मालक शरद पवार यांच्या घरी जाऊन आल्यानंतर राज्य सरकारने वीजबिल माफीचा प्रस्ताव गुंडाळला, या राज ठाकरे यांच्या आरोपालाही अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. या गोष्टीत थोडंही तथ्य नाही. काही लोक बोलत असताना अशा मान्यवरांची नावं घेतात की, त्यामधून बातम्या तयार होतात. शरद पवार 60 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. ते असे करुच शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला.