चेन्नई – इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव 337 धावांवर संपुष्टात आला. 578 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या प्रमुख फलंदाजांच्या सुमार फलंदाजीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात 241 धावांची मोठी आघाडी मिळाली. इंग्लंडचा दुसरा डाव रवीचंद्रन अश्विनच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर केवळ 178 धावांवर संपला व भारतासमोर विजयासाठी 420 धावा करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. हा सामना वाचवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी भारताला नव्या रननीतीची गरज आहे.
सोमवारी चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने आपल्या दुसऱ्या डावात 1 गडी गमावून 39 धावा केल्या असून विजयासाठी त्यांना अद्याप 381 धावांची आवश्यकता आहे. रोहित शर्मा बाद होऊन परतला असून खेळपट्टीवर शुभमन गिल 15 तर, चेतेश्वर पुजारा 12 धावांवर खेळत आहेत.
ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा, वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी केलेली अर्धशतकी खेळी व रवीचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा दाखवलेली जिद्द यांमुळे भारताला त्रिशतकापेक्षा जास्त मजल मारता आली. भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढवणार होती, पण इंग्लंडने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड दुसऱ्या डावात फलंदाजी आल्यानंतर उपहारापूर्वी केवळ 2 षटकांचा खेळ झाला. त्यातही पहिलेच षटक अश्विनने टाकले व पहिल्याच चेंडूवर सलामीवीर रॉरी बर्न्सला शून्यावर माघारी धाडले.
इंग्लंडने त्यांच्या दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट अत्यंत बेजबाबदार पद्धतीने गमावल्या. अश्विनने त्यांचे सहा गडी बाद करत भारतीय गोलंदाजीची मुख्य धुरा वाहिली. त्यांचा दुसरा डाव केवळ 178 धावांवर संपला मात्र, पहिल्या डावातील 241धावांच्या आधीक्यामुळे त्यांनी भारतासमोर विजयासाठी 420 धावा करण्याचे कठीण आव्हान उभे केले.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवातही अत्यंत खराब झाली. सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा जॅक लीचच्या अप्रतिम फिरकीवर त्रिफळाबाद होऊन तंबूत परतला. त्यावेळी भारताच्या 1 बाद 25 धावा झाल्या होत्या. त्यानंतर शुभमन गिलने चेतेश्वर पुजाराच्या साथीत उर्वरीत षटके खेळून काढली. खेळ थांबला तेव्हा भारताच्या 1 बाद 39 धावा झाल्या असून विजयासाठी अद्याप 381 धावांची गरज आहे.
त्यापूर्वी, 578 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा पहिल्या डावाची सुरूवात खराब झाली. हिटमॅन रोहित शर्मा 6, शुभमन गिल 29, कर्णधार विराट कोहली 11 व अजिंक्य रहाणे 1 हे चार प्रमुख फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा व ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरला.
पुजाराने 11 चौकारांसह 73 धावा केल्या. तर, पंतने 9 चौकार व 5 षटकारांसह 91 धावा केल्या. ब्रिस्बेन कसोटीनंतर त्याचे सलग दुसरे शतक पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरनेही अफलातून अर्धशतकी खेळी केली. अश्विनच्या साथीने त्याने संघाला 300 चा पल्ला पार करून दिला. अश्विन 31 धावांवर बाद झाल्यावरही सुंदरने जिद्दी खेळी केली. त्याने 12 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 85 धावा केल्या. त्यापूर्वी, इंग्लंडचा डाव सर्वबाद 578 वर संपला. भारताकडून जसप्रीत बुमराह व रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी 3 तर, इशांत शर्मा व शाहबाज नदीमने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड पहिला डाव – 190.1 षटकांत सर्वबाद 578 धावा. (ज्यो रूट 218, डॉमनिक सिबली 87, बेन स्टोक्स 82, जसप्रीत बुमराह 3-84, रवीचंद्रन अश्विन 3-146, इशांत शर्मा 2-52, शाहबाज नदीम 2-167). भारत पहिला डाव – 95.5 षटकांत सर्वबाद 337 धावा. (चेतेश्वर पुजारा 73, रवीचंद्रन अश्विन31, शुभमनगिल 29, ऋषभ पंत 91, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 85, डॉमनिक बेस 4-76, जेम्स ऍण्डरसन 2-46, जोफ्रा आर्चर 2-75, जॅक लिच 2-105). इंग्लंड दुसरा डाव – 46.3षटकांत सर्वबाद 178 धावा. (ज्यो रूट 40, ऑलिव्हर पोप 28, डॉमनिक बेस 25, जोस बटलर 24, रवीचंद्रन अश्विन 6-61, शाहबाज नदिम 2-66, ईशांत शर्मा 1-24, जसप्रीत बुमराह 1-26). भारत दुसरा डाव – 13 षटकांत 1 बाद 39 धावा. (रोहित शर्मा 12, शुभमन गिल खेळत आहे 15, चेतेश्वर पुजारा खेळत आहे 12, जॅख लिच 1-21).