चेन्नई – इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव 337 धावांवर संपुष्टात आला. 578 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या प्रमुख फलंदाजांच्या सुमार फलंदाजीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात 241 धावांची मोठी आघाडी मिळाली. इंग्लंडचा दुसरा डाव रवीचंद्रन अश्विनच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर केवळ 178 धावांवर संपला व भारतासमोर विजयासाठी 420 धावा करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, या सामन्यात अश्विनने अनोखी कामगिरी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात गेल्या 114 वर्षांत डावाच्या पहिल्याच चेंडूवर एकाही फिरकी गोलंदाजाला बळी घेता आला नव्हता. पण चेन्नई कसोटी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताचा ऑफस्पीनर रवीचंद्रन अश्विन याने पहिल्या चेंडूवर बळी घेत विक्रम मोडीत काढला आहे.
यापूर्वी 1888 साली इंग्लंडच्या बॉबी पील यांनी ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक बेन्नेर्मनला बाद करून प्रथम हा पराक्रम केला होता. त्यानंतर 1907 साली दक्षिण आफ्रिकेच्या अल्बर्ट व्होग्लर यानी इंग्लंडच्या टॉम हेयबर्ड यांना बाद केले. त्यानंतर तब्बल 114 वर्षांनंतर अश्विनने ही कामगिरी केली.