बीसीसीआय किंवा आयपीएल समितीत जे थिंकटॅंक म्हणून बसले आहेत, त्यांना भारतीय हवामान खाते ही अंधश्रद्धा वाटते का? हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे जेव्हा बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेच्या साखळी सामन्यांनंतर प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर केले तेव्हाच एका प्रसिद्ध संकेतस्थळावर एक वृत्त वाचनात आले होते. पश्चिम बंगालमध्ये मे महिन्याच्या 15 तारखेनंतर जवळपास 30 तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली गेली होती.
हे माहिती असतानाही बीसीसीआयने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफमधील क्वॉलिफायर 1 व एलिमिनेटर हे दोन सामने कोलकातामध्ये आयोजित केले आहेत. आता जर मंगळवारी होत असलेल्या पहिल्या क्वॉलिफायर सामन्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये तसेच इशान्य भारतात पावसाचा हाहाकार सुरू आहे तर मग हे सामने पूर्ण होणार का, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो.
बीसीसीआयला सतत सामने खेळवण्यात रस आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण हे सामने आयोजित करताना कोणत्या राज्यात कोणते हवामान असते, ते वेळापत्रक जाहीर करताना लक्षात घेतले जात नाही, हेच यातून उघडपणे दिसत आहे. आता नेट रनरेट व साखळीतील गुणांचा फरक लक्षात घेता गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा पहिला क्वॉलिफायरचा सामना पावसाने वाया गेला तर गुजरातच्याच संघाचा फायदा होणार आहे व राजस्थानला एकाही चेंडूचा सामना न होता हा सामना गमवावा लागेल.
अर्थात क्वॉलिफायर 2 सामन्यांमुळे त्यांना संधी तरी मिळेल. पण जी गत या दोन संघातील सामन्याची आहे, त्यापक्षाही खराब स्थिती रॉयल चॅलेंजर बेंगळुरूची होणार आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा एलिमिनेटरचा सामना या दोन संघात कोलकातातीलच ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे.
हा सामनाही पावसाने वाया गेला, तर नेट रनरेट व गुण यांचा निकष लावला तर बेंगळुरूचे थेट आव्हानच संपुष्टात येणार आहे तेदेखील न खेळता. दुसरी क्वॉलिफायर लढत व अंतिम लढत अहमदाबादमध्ये होणार आहे, तेथे पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही, पण मग जर कोलकातात दरवर्षी 15 मेनंतर हीच परिस्थिती असते व सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे याच पश्चिम बंगालचे आहेत तर याच हवामानाच्या अंदाजाला केराची टोपली का दाखवली गेली.
खरेतर या कालावधीपासून जवळपास नोव्हेंबर महिन्यापर्यंत हवामानाच्या अंदाजाला गांभीर्याने घेऊनच सामन्यांचे वेळापत्रक तयार केले गेले पाहिजे. दरवर्षी या काळात होणाऱ्या सामन्यांवर पावसाचे सावट निर्माण होते. मात्र, बीसीसीआय याबाबत कोणतीही ठोस पाऊले उचलताना दिसत नाही. त्यांच्या दृष्टीने हवामानाचा अंदाज ही अंधश्रद्धा आहे का?