दुबई | अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील अखेरच्या दोन साखळी सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. हे दोन सामने सायंकाळी साडेसात वाजता एकाच वेळी दोन भिन्न मैदानांवर खेळवले जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
सनरायझर्स हैदराबाद व मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हे दोन्ही सामने 8 ऑक्टोबर रोजी खेळवले जाणार आहेत. आयपीएलमध्ये एकाच वेळी दोन सामने खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आयपीएलमध्ये डबल हेडर सामने खेळवले जातात. मात्र, एकाच दिवसात एक सामना दुपारी व एक सामना सायंकाळी खेळवला जातो. साखळी सामन्यांचा टप्पा 8 ऑक्टोबरला संपणार असून, त्यानंतर प्ले ऑफचे सामने होतील. अंतिम लढत 15 ऑक्टोबरला होणार आहे.