नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेचा लिलाव येत्या 18 फेब्रुवारीला होणार असला तरीही स्पर्धा कुठे होणार याबाबत अद्याप बीसीसीआयने काहीही जाहीर केलेले नाही. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाची स्पर्धा देखील अमिरातीतच होण्याचे संकेत मिळत आहेत.
यंदाच्या स्पर्धेसाठी मिनी लिलाव होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले असले तरीही ही स्पर्धा भारतातच होणार असे ठामपणे सांगितलेले नाही. तसेच करोनाची परिस्थिती फारशी बदलली नाही व विलगीकरणामुळे खेळाडूंनी माघार घेण्याचे अस्त्र उगारले तर अमिरातीचा पर्याय उपलब्ध असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच भारतात इंग्लंडविरुद्धची मालिका पार पडल्यावर तसेच परदेशी संघांच्याही विविध मालिका संपल्यावर त्यांना भारतात आल्यावर पुन्हा विलगीकरणात राहण्याचे बंधन स्पर्धेसाठी अडचणीचे ठरू शकते त्यामुळेच ही स्पर्धा देशाबाहेर खेळवण्याचा कल वाढला आहे.
आयपीएलसाठी यावेळी होणारा लिलाव हा मिनी स्वरूपाचा असेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांनंतर हा लिलाव चेन्नईतच होणार आहे. पहिला सामना 5 ते 9, तर दुसरा सामना 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. आयपीएलचा लिलाव निश्चित झाला असला, तरी अजून आयपीएल यावेळी कुठे होणार हे अजून जाहीर करण्यात आलेले नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यावेळी स्पर्धा भारतात घेण्यास आग्रही आहेत. गेल्या वर्षीची स्पर्धा उशिराने संयुक्त अरब अमिराती येथे खेळविण्यात आली होती.
आयपीएलच्या या लिलावात सर्वाधिक खर्च करण्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबकडे सर्वात जास्त रक्कम आहे. ते 53.20 कोटी रुपये घेऊन लिलावात उतरतील. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्सकडे 35.90 कोटी, तर राजस्थान रॉयल्सकडे 34.85 कोटी रुपये आहेत. सर्वात कमी म्हणजे 10.75 कोटी रुपये घेऊन कोलकता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद फ्रॅंचाईजी लिलावात उतरतील.
भारताची इंग्लंडविरुद्धची आगामी मालिका सुरळीत पार पडल्यास आयपीएल भारतात होण्यास पाठबळ मिळेल असे मानले जात आहे. फ्रॅंचाईजींनी खेळाडूंना कायम करण्याची मुदत 20 जानेवारीलाच संपली असून, आता अंतर्गत व्यवहारची मुदत 4 फेब्रुवारीपर्यंत असेल. फ्रॅचाईजींनी स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेलपासून केदार जाधव, ख्रिस मॉरिस, हरभजन सिंग अशा प्रमुख खेळाडूंना करारमुक्त केले आहे. एकूण 57 खेळाडूंना मुक्त करण्यात आले असून, 139 खेळाडू कायम ठेवण्यात आले आहेत.