डॉ. राजू गुरव
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यापुढे ऑनलाइनद्वारेच घेण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यासाठी नव्याने स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवून कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियम 2009 च्या तरतुदी लक्षात घेता इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे. याबाबत 13 फेब्रुवारी 2013 रोजी आदेश दिले होते. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनेही अधिसूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, वर्षातून दोनवेळा “टीईटी’ घेण्याचीही घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात वर्षातून एकदाच घेताना मोठी कसरत करावी लागत आहे.
2013 पासून आजतागायत सहा परीक्षा घेण्यात आल्या. यात एकूण 86 हजार 298 उमेदवार उत्तीर्ण झाले. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकविण्यासाठी “टीईटी’च्या पहिल्या पेपरची परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधनकारक आहे. आतापर्यंत यात 42 हजार 713 उमेदवार उत्तीर्ण झाले. इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक दोनमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यात 43 हजार 585 उमेदवार उत्तीर्ण झाले. 2013 मध्ये झालेल्या पहिल्या परीक्षेला 6 लाख 19 हजार 391 आणि 2019 मध्ये 3 लाख 43 हजार 284 उमेदवार बसले होते.
शिक्षक भरतीवरील सततची बंदी व “टीईटी’ उत्तीर्ण होऊनही नोकऱ्या मिळत नसल्याने उमेदवारांची संख्या कमी होत आहे. परीक्षा परिषदेला आर्थिक फटकाही बसत आहे. एका परीक्षेतून उमेदवारांकडून परीक्षा शुल्काच्या माध्यमातून सुमारे 13 कोटी रुपये जमा होत होते. नोकऱ्या वाचविण्यासाठी काही शिक्षकांनी “टीईटी’ची बोगस प्रमाणपत्रेही सादर केल्याचे काही प्रकार समोर आले. अगदी सुरुवातीला “टीईटी’ ऑनलाइनद्वारे घेण्यासाठी धोरण ठरवले होते. मात्र, त्यावेळी यासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे ऑफलाइनद्वारे घेण्याचा मार्ग निवडला होता. तोच मार्ग आतापर्यंत अंमलात आणला जात आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडे विविध “ओएमआर’ बेस परीक्षा घेण्यासाठी खासगी कंपन्यांकडून फेरनिविदा मागवल्या. यात पाच कंपन्यांकडून निविदा दाखल झाल्या. मात्र, यातील कोणाला काम द्यायचे हे अद्याप निश्चित झालेले नाही. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना 25 जानेवारी 2021 रोजी पत्र पाठविले आहे. सध्या राबविण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेतून “टीईटी’ वगळून स्वतंत्रपणे राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
“टीईटी’ आणखी लांबणीवर पडणार
राज्यात 2020 या वर्षात करोनामुळे “टीईटी’ झाली नव्हती. त्यामुळे 2021 मध्ये एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यास परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी 22 डिसेंबर 2020 रोजी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे आता ही ‘टीईटी’ आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.