चिनी कंपनीचे प्रायोजकत्व कायम, कुठे गेला जनमताचा आदर
नवी दिल्ली – जनमताचा आदर ठेवून चिनी कंपनीच्या आयपीएल स्पर्धेच्या प्रायोजकत्वाचा विचार करू, अशी वल्गना करत असलेल्या बीसीसीआयने अखेर “ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या’ हेच सिद्ध करत चीनच्या व्हिवो कंपनीचे प्रायोजकत्व कायम ठेवल्याने त्यांच्यावर देशवासीयांकडून टीकेची झोड उठली आहे. कुठे गेला जनमताचा आदर, असा प्रश्न विचारत सोशल मीडियावर बायकॉट आयपीएल असा हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला आहे.
आयपीएललाच बायकॉट करा असे आवाहन करत अनेकांनी बीसीसीआयवर टीका केली आहे. अमिरातीत आयोजित होत असलेल्या आयपीएलबाबत रविवारी बैठक झाली. त्यात अनेक निर्णय घेण्यात आला त्यातच या व्हिवोच्या प्रायोजकत्वाचाही निर्णय घेतला गेला. यंदा कायदेशीर बाबींचा अभ्यास करत यंदाच्या स्पर्धेसाठी हे प्रायोजकत्व कायम ठेवले गेल्याचे जाहीर करून पुढील वर्षीपासून याबाबत विचार केला जाईल, असे बीसीसीआयने जाहीर केले. मात्र, त्यांच्याकडून मिळत असलेल्या 400 कोटी रुपयांसाठीच बीसीसीआयने अखेर देश भावनेपेक्षा कोट्यवधींच्या करारालाच महत्त्व दिल्याचे स्पष्ट झाले. यावरूनच आता आयपीएल विरोधी मोहीम सुरू झाली आहे.
लडाखमधील तणाव व देशात निर्माण झालेला चीनविरोधी असंतोष दिवसेंदिवस वाढत असताना बीसीसीआयने चीनच्या या कंपनीचे प्रायोजकत्व रद्द करावे अशी मागणी होत होती. मात्र, इतक्या कमी कालावधीत अन्य प्रायोजक मिळणे कठीण असल्याने व्हिवोशी असलेला करार यंदा कायम राहणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
आयपीएलबाबतच्या निर्णयांतील महत्त्वाचे
(1)यंदाची आयपीएल अमिरातीतच
(2)19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान स्पर्धा
(3)अंतिम सामना प्रथमच मंगळवारी
(4)सर्व सामने सायंकाळी साडेसात वाजता
(5)डबल हेडरमध्ये पहिला सामना दुपारी 3:30 वाजता
(6)संघांना 20 ऑगस्टला अमिरातीत जाण्याची परवानगी
(7)प्रत्येक संघात केवळ 24 खेळाडू
(8) कोविड रिप्लेसमेंटला परवानगी